
कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव विधानसभा मतदार संघात विजेच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत, शेतकरी वर्गाला यंदा विहिरीत पाणी असूनही ते विजेच्या समस्येमुळे पिकांना देता आले नाही, वीज मंडळाच्या अनागोंदी कारभाराचा फटका येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून त्यांची पिके हातातून गेली आहेत, शेतकऱ्यांबरोबरच वीज ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे, या प्रश्नाची दाद कुणांकडे मागायची असा प्रश्न पडला असुन पाणी असुनही पिक उत्पादनांत मोठा फटका बसुन त्याची भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी एका निवेदनाद्वारे उर्जामंत्री नितीन राऊत व वीज वितरण कंपनीचे नाशिक येथील मुख्य अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे., याप्रश्नी ग्राहक मंचाचे दरवाजे ठोठावून, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ, शेतकऱ्यांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे वीज वितरण कंपनीने अंत पाहू नये असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे कार्यकाळात वीज समस्यांचा आढावा घेऊन तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वीज रोहित्रांचे अपग्रेडेशन करून आनले, नव्याने वीज रोहित्र वाढविली, विज उपकेंद्रांच्या निर्मिती केल्या, मात्र त्यानंतर त्याचा पुरेशा प्रमाणांत पाठ पुरावा न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना वीजेच्या गंभीर अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच उर्जामंत्री व त्यांचे अधिकाऱ्यानी धरसोडीचे धोरण स्विकारत शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज देण्यांची विधीमंडळात घोषणा केली अन अधिवेशन संपताच रोहित्राची विज तोडण्यांत आली. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत थकबाकी भरली पण त्यांना वीज नियमीत देण्यांत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा झाला, जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करून मिळाली नाही त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची रब्बी पिके पाणी असुनही ते न देता आल्याने जळून खाक झाली. तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या झालेल्या वीजतारा एकमेकांना घर्षण होऊन त्यातून पिके जळाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. असंख्य शेतकऱ्यांचे उसासह अन्य पिके आगीत जळून खाक झाली त्या शेतकऱ्यांच्या समस्यांना कुणीही वाली राहिला नाही. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची मतदारसंघातील असंख्य गावातील शेतकऱ्यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन याप्रश्नी दाद मागितली व कोपरगाव तालुक्यात सध्या सुरु असलेला वीजेचा खेळखंडोबा थांबवावा, वीज वितरणांत सुरळीतपणा आणावा व झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळावी अशा अनेक मागण्या केल्या आहेत. तेव्हा वीज वितरण कंपनीने या गंभीर तक्रारींची तातडीने दखल घ्यावी व शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, अन्यथा ग्राहक मंचाकडे याबाबत तक्रार करून न्याय मिळवावा लागेल असे विवेक कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.
चौकट:-
रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
विज समस्यांमुळे शेतकऱ्यांचे यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले, तेव्हा या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करून शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ असेही विवेक कोल्हे म्हणाले.
