
कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या कोरोना विषाणुचे प्रमाण घटल्याने पुर्वीप्रमाणे श्री साईसत्यव्रत व अभिषेक पूजा सुरु करण्याचा निर्णय संस्थानच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने घेण्यात आला असून दिनांक ०१ एप्रिल रोजी सकाळी ०७.०० वाजता श्री साईसत्यव्रत पूजा व अभिषेक पूजेचा शुभारंभ करण्यात आला. तर श्री साईसत्यव्रत पुजेस १२८ व अभिषेक पूजेस ३९ यजमान सहभागी झाले होते.
जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे दोन वर्षात राज्य शासनाच्या वतीने दोन वेळा लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा श्री साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले तेव्हा श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. सध्या कोरोना विषाणुचे प्रमाण घटल्याने राज्य शासनाच्या वतीने कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे भाविकांकरीता संस्थानच्या वतीने एकामागुन एक सुविधा खुल्या करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने संस्थान व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरु करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार दिनांक ०१ एप्रिल रोजी सकाळी ०७.०० वाजता श्री साईसत्यव्रत पूजा व अभिषेक पूजेस सुरुवात झाली. सकाळी ०७.०० ते ०८.००, सकाळी ०९.०० ते १०.०० या बॅचेसमध्ये श्री साईसत्यव्रत पूजा तर सकाळी ०७.०० ते ०८.०० व सकाळी ०९.०० ते १०.०० या बॅचेसमध्ये अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पूजेस उपस्थित यजमानांना संस्थानच्या वतीने प्रसाद म्हणुन एक श्रीफळ व शिराप्रसाद आणि लाडू पाकीटे देण्यात आले. तसेच श्री साईसत्यव्रत पुजेस संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके व अविनाश दंडवते यांनी सपत्नीक हजेरी लावली.
