
कोपरगांव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे म्हणजे व्हीजनरी मॅन, शेतक-यांची शेती कमी खर्चात अधिक उत्पादन कशी देईल हा ध्यास असणारे, काळाच्या कितीतरी पुढे जात त्यानुरूप धोरणे आखून काम करणारे, विकासाची फळे तुम्हां-आम्हाला चाखायला देणारे सर्वमान्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात महाराष्ट्र राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे माजी अध्यक्ष, उद्योगपती कैलास ठोळे यांनी श्रध्दांजली वाहिली.
कोपरगांव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात रविवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा आयोजित करण्यांत आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुमनांजली अर्पण करण्यांत आली.
कैलास ठोळे पुढे म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांनी साखर धंद्यातील सध्याची येणारी स्थित्यंतरे काळाच्या पुढे जात कितीतरी अगोदर ओखळली होती, अडचणीतल्या साखर उद्योगाला पुढे नेण्यांसाठी इथेनॉल निर्मीती धोरण सध्या मोठया प्रमाणात सुरू आहे पण त्याची मुहूर्तमेढ कोल्हेंनी २५ वर्षाआधीच संजीवनीत रोवली होती. तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार हे साखर आयात निर्यातीबाबत वेळोवेळी निर्णय घेतांना शंकरराव कोल्हे यांचा सल्ला प्रमाण मानायचे, कोपरगांवचे गेलेले हक्काचे पाणी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत त्यांनी शेकडो बंधारे बांधून शेतक-यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील असतांना साखरेवर कर लावण्याचा निर्णय घेतला होता पण तो या उद्योगला अडचणीत आणून कसा जाचक आहे हे शंकरराव कोल्हे यांनी आपल्याच शासनाला पटवून देत केवळ शेतक-यांच्या भल्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी थांबविली होती. ग्रामिण भागातील सुशिक्षीत बेरोजगार मुला मुलींसाठी कॉल सेंटरची संकल्पना मांडत त्यांनी ती पुर्ण केली. वेळप्रसंगी शेतक-यांच्या प्रसंगी त्यांनी सत्ताधा-यांच्या विरोधात आंदोलने छेडली होती हा इतिहास आहे. वाचनावर त्यांची कमांड होती जगातील सर्व चांगल्या पुस्तकांचे ते वाहनातच वाचन करत वाचनातुन त्यांनी स्वतःला आणि राज्याला घडविण्याचा प्रयत्न केला, ते द्रष्टे नेते होते त्यांचे सारखे साहेब होणे नाही.
भारत संचार दुरनिगमचे संचालक रविंद्र बोरावके म्हणाले की, शंकरराव कोल्हे यांनी संपुर्ण आयूष्यात करारीपणे झुंज देत सर्व प्रश्नांची सोडवणुक केली, त्यांच्याबाबतीत असेल मी, नसेल मी, पण कार्यातुन दिसेल मी असेच म्हणावे लागेल. त्यांच्या जाण्यांने राजकारणांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, १९७२ च्या निवडणुकीपासून आपण त्यांना ओळखायचो, त्यांच्याबरोबर सामाजिक, राजकीय कार्यात काम करण्यांचा प्रदीर्घ अनूभव मिळाला. धोतर, पांढरा शर्ट, टोपी शेतक-याची देहबोली न सोडता चॉकलेट सारखी कोरफड खाणारा, व्यासंगी नेता आपल्यातुन हरपला. शंकरराव कोल्हे जेंव्हा सहकारमंत्री झाले तेंव्हा त्यांनी सर्वसामान्यांची पत निर्माण करून पतसंस्थांचे राज्यात जाळे तयार केले.
जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे राजकारणांतील अनेक पैलु असुन नव्या पिढीत त्यांच्या सारखा संघर्ष कुणी करू शकत नाही, त्यांच्यामुळेच आपली राजकीय कारकिर्द संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरू झाली. पाण्याच्या प्रश्नावर खमकी भूमिका मांडुन समस्या सोडविणारे नेतृत्व हरपले येथुन पुढच्या पाण्याच्या लढयासाठी सर्वानी एक व्हावे असे ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे स्वभावाने कडक होते, पण तळागाळातील घटकांचा विचार करून त्यांच्या प्रश्नांची कड लावणारे सर्वमान्य नेतृत्व होते. कोपरगांव शहर पाण्याच्या प्रश्नावर स्वतःच्या शासनाविरूध्द भांडुन निधी आणणारे आणि पंचवीस एकर जागा घेवुन सध्या पाचव्या साठवण तळयाचे जे काम सुरू आहे त्याची मुहुर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनीच रचली हा इतिहास कुणालाही विसरता येणार नाही. परिवहनमंत्री काळात त्यांनी कोपरगांवच्या शेकडो सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय सेवेत एक दमडीही खर्च न करता नोकरीला लावले. रयत शिक्षण संस्थेत मॅनेजींग कौन्सील सदस्य म्हणून त्यांच्या कार्याला तोड नाही.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, जिल्हा शिवसेनेचे प्रमोद लबडे, अनिल सोनवणे रियाज शेख, सरला दिदी, डॉ यशराज महानुभाव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, मनसेचे बापू काकडे, माजी नगराध्यक्ष अशोक कोठारी, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे, राघवेश्वर उंडे महाराज, भंते आनंद सुमन, विधीज्ञ जयंत जोशी, नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र काले, रिपाईचे जितेंद्र रणशुर, राजेंद्र बंब, चंद्रकांत शिंदे, नितीन कासलीवाल, लव्हाटे महाराज, कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा, अनिल पारेख, अंबादास अंत्रे, सुरेश जाधव, मारूती कोपरे, त्रिभुवन ताई आदिंनी श्रध्दांजली वाहिली. सुत्रसंचलन माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, सुशांत खैरे यांनी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पराग संधान, विजय आढाव, केशव भवर, कामगार नेते मनोहर शिंदे, मनसेचे संतोष गंगवाल, भरत मोरे, कलविंदर दडीयाल, कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक अरूण येवले, कोपरगांव नगरपालिकेचे सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, नारायण अग्रवाल, कैलास खैरे, पप्पू पडीयार, विश्वासराव महाले, विजय वाजे, राजेंद्र सोनवणे, बबलु वाणी, डॉक्टर, वकील, व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक, यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
