दोन वर्षात ना. आशुतोष काळेंनी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ५५ कोटी आणले, तुमच्या खोडसाळ राजकारणापायी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका:- सोमनाथ चांदगुडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :-
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंतरावजी पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपये निधीला मंजुरी मिळविली असून दरवर्षी कालवे दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपये मिळणार आहे. चालू वर्षात आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. याउलट ज्यांच्याकडे ४० वर्ष सत्ता होती. सत्तेत असतांना त्यांचे देखील त्या सरकारमध्ये चांगले वजन होते. त्यांना कधीच गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मांडावा असे वाटले नाही. त्यांचेच कुटुंबातील सदस्य अपूर्ण माहितीच्या आधारे गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी वेळकाढूपणा नको असे वक्तव्य करतात. हे हास्यास्पद असल्याचे सांगत तुमच्या खोडसाळ राजकारणापायी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका असा घरचा आहेर भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे यांनी विवेक कोल्हे यांना दिला आहे.
मागील अनेक वर्षापासून गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे कालव्यांची वहनक्षमता कमी होवून त्याचा परिणाम सिंचनावर होत होता. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींकडून कालवे दुरुस्तीची अपेक्षा होती.२००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या कार्यकाळात माजी आमदार अशोकराव काळे विरोधी पक्षाचे आमदार असतांना त्यांनी गोदावरी कालव्यांची दुरुस्ती केली होती. याउलट जे आज कालवा दुरुस्तीसाठी गळा काढीत आहेत त्यांच्याच घरात ४० वर्ष सत्ता होती. सत्ता असतांना त्यांचेसुद्धा सरकार दरबारी चांगले वजन होते. मात्र त्यांना कधीच कालवे दुरुस्तीला प्राधान्य द्यावेसे वाटले नाही याची लाभधारक शेतकऱ्यांना अजूनही खंत आणि आश्चर्य वाटते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ना. आशुतोष काळे यांनी आपल्या जाहीरनाम्यात गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा शब्द दिलेला आहे. त्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून सातत्याने जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे त्यांचा पाठपुरावा सुरु होता त्या पाठपुराव्यातून गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने ३०० कोटी रुपये निधी मंजूर केला असून प्रत्येक वर्षी १०० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. ८४ कोटीच्या कालवे दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून त्यापैकी ३६ कोटीच्या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. वैश्विक कोरोना महामारीमुळे राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असतांना ना. आशुतोष काळे यांनी कालवे दुरुस्तीसाठी निधी मिळविला आहे. ही लाभधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब असून अनेक वर्षानुवर्षापासूनचा अतिशय महत्वाचा प्रश्न ना. आशुतोष काळे यांच्यामुळे मार्गी लागला आहे. त्यामुळे अशा कार्यक्षम नामदारांच्या मागे लाभधारक शेतकरी खंबीरपणे उभे आहेत.
गोदावरी कालव्यांचे आयुर्मान ११५ वर्षापेक्षा जास्त झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीच पावले उचलली जाणे गरजेची होती. ती का उचलली नाही याबाबत बोलणे गरजेचे आहे. त्यामुळे ४० वर्षात गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीची कामे का झाली नाही याची माहिती आपल्या वडिलधाऱ्यांकडून घ्या मात्र खोडसाळ राजकारणापायी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका असा घरचा आहेर सोमनाथ चांदगुडे यांनी कोल्हेंना दिला आहे.
हे तर पुतना मावशीचं प्रेम..

चौकट :- कालवे दुरुस्तीसाठी ना. आशुतोष काळे समर्थ आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे. कालवे दुरुस्तीबरोबर शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन देखील तेवढेच महत्वाचे आहे त्यामुळे आवर्तनाचा काळ वगळून कालवे दुरुस्ती करावी लागणार आहे हे लाभधारक शेतकरी जाणून आहेत. मात्र ज्यांनी त्यांच्या कार्यकाळातलवा सल्लागार समितीची बैठक लाभ क्षेत्रातून मुंबईला नेली तेच आज कालव्यांच्या दुरुस्तीबाबत दाखवीत असलेला कळवळा हे तर पुतना मावशीचं प्रेम आहे. – सोमनाथ चांदगुडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *