ना. आशुतोष काळे करीत असलेला विकास कोल्हे व त्यांच्या अर्धवट कार्यकर्त्यांना कधीच दिसणार नाही:- सुधाकर रोहोम…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा निर्माण झालेला मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून रस्त्यांसाठी ९५ कोटीचा निधी आणला आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांपासून मुख्य रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र पाच वर्ष ज्यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता हातात असतांना देखील ज्यांच्याकडून नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यांना व त्यांच्या अर्धवट कार्यकर्त्यांना ना.आशुतोष काळे करीत असलेला विकास कधीच दिसणार नाही अशी टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी भाजप तालुकाध्यक्ष रोहोम यांच्यावर केली आहे.
कोपरगाव ते सावळीविहीर रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक, दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेला पाठपुरावा व या रस्त्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी ना.आशुतोष काळे यांनी केलेले प्रयत्न कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेला माहित आहे. मात्र ज्यांच्या काळात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे मतदार संघातील जनतेला अपेक्षित होते त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे त्यांना जनतेने २०१९ च्या निवडणुकीत घरी बसवले तेच आमच्यामुळे या रस्त्यासाठी निधी मिळाल्याचे सांगत श्रेय घेण्यासाठी आटापिटा करीत आहेत.
ज्यावेळी सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० मंजूर करण्यात आला त्याचवेळी राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ जी असा क्रमांक देण्यात आला व काही दिवसातच एन.एच.१६० चे प्रत्यक्षात काम देखील सुरु झाले होते. मात्र दुसरीकडे एन.एच.७५२ जी हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत देखील करण्यात आला नव्हता. त्यामुळे या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून फक्त नामोल्लेख होत होता.परंतु या रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन आमदार त्यावेळी हातावर घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले होते. यदाकदाचित ते काम त्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्यामुळे ते होऊ शकले नाही हे त्यावेळी जनतेने समजून घेतले होते.
परंतु कोपरगाव ते सावळीविहीर रस्त्यावर होणारे अपघात व नागरिकांना होणारा त्रास याची दखल घेऊन ना.आशुतोष काळे यांनी एन.एच.७५२ जी हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविल्यामुळे व केलेल्या पाठपुराव्यातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे कोपरगाव ते सावळीविहीर रस्त्यासाठी १७८ कोटी निधी मंजूर झाला हि वस्तुस्थिती आहे. विरोधकांनी केवळ त्यांच्या पक्षाचे मंत्री असल्यामुळे आमच्यामुळेच निधी मिळाला असा कितीही डांगोरा पिटला तरी त्यांच्या भूलथापांना जनता आता भुलणार नाही कारण ये पब्लिक हैं ये सब जानती हैं असे सूचक विधान सुधाकर रोहोम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *