कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली सदिच्छा भेट..!!

Uncategorized

सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांचे सामाजिक कार्य आदर्शवत:- मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनीधी:-
(नाशिक,पिंपळगाव बसवंत):- थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक चवळवळीचे काम छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. या विचारांचा वारसा पुढे नेऊन समाजसेवेचे अतिशय मौल्यवान कार्य कर्मवीर गणपतदादा मोरे आणि त्यांच्या पत्नी यांनी पुढे नेले असून सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांचे हे सामाजिक कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पिंपळगाव बसवंत येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, विश्वासराव मोरे, रवींद्र मोरे, प्रा.अशोक पिंगळे, प्रा.अशोक सोनवणे, सुरेश खोडे, बाळासाहेब बनकर, गणेश बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.१८७३ साली ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा असूड हा शेतकऱ्यांच्या व्यथा अतिशय पोटतिडकीने मांडणाऱा ग्रंथ प्रकाशित केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर सत्यशोधक समाजाच्या कार्यात ज्योतिबांना अतिशय खंबीरपणे साथ दिली. सावित्रीबाईनीं शेवटच्या श्वासापर्यंत सत्यशोधक समाजाचे काम अविरतपणे केले.ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यानंतर सत्यशोधक समाजाच्या कामाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी चालना दिली.ह्याच विचारांचा वारसा पुढे चालवितांना समाजधुरिणांनी शिक्षणावीना समाजाची प्रगती शक्य नाही,हे अचुक सत्य हेरले.समाजातील अज्ञान व अंधश्रध्देचा अंधकार दुर करण्यासाठी आयुष्य वेचले.त्यात अग्रक्रमाने नामोल्लेख होतो तो सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांचा.सत्यशोधक समाजाचा विचार जनमानसात रूजविण्याबरोबरच बहुजन समाजाला शिक्षणांची दारे खुली करून देण्याचे अजोड कार्य त्यांनी केले असे त्यानी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा होती. आज या भेटीचा योग आला हे माझे भाग्य समजतो. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले तसेच कार्य कर्मवीर गणपतदादा मोरे आणि त्यांच्या पत्नीने केले. मनुवादाच्या अन्यायाच्या विरोधात लढलेल्या या कर्मवीरांचे विचार आपल्याला विसरता कामा नये. त्यासाठी आपण किमान एक पाऊल पुढं आलं पाहिजे.आपण महापुरुषांचे विचार नवीन पिढीमध्ये रुजविण्यास कमी पडलो तर आपण गुन्हेगार ठरू असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की समाजात अजूनही अंधश्रद्धा कमी झालेली नाही ती दूर करण्यासाठी महापुरुषांचे विचार आपल्याला जपायला हवे. इतिहास हा चुकीच्या पद्धतीने पसरविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेलं शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी ही पुस्तके प्रत्येकाने वाचण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *