कोपरगांव प्रतिनिधी:-
राष्ट्रसंत गाडगेबाबांनी ग्रामिण भागातील जुन्या चालीरीतीतुन होणारी अंधश्रध्दा मोडीत काढत खेडूतांच्या मनांतील मळ दुर करून स्वच्छतेचे महत्व वाढविण्यांसाठी किर्तनातुन जनजागृती केली आणि आताही कोरोना महामारीत त्यांचेच विचार श्रेष्ठ असल्याची प्रचिती येते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
शहरातील गजानननगर भागातील परिट समाज बांधवांच्या वतींने राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी हभप गणपत महाराज लोहाटे यांनी गाडगेबाबांच्या विचारप्रेरणेची आणि किर्तन परंपरेची माहिती दिली. चंद्रकांत वाघमारे, संजय जगताप व परिट बांधवांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपा गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, नगरसेविका विद्या सोनवणे, हर्षदा कांबळे, दिपा गिरमे, दिनेश कांबळे, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, रविंद्र राउत, अनिल देसाई, अरूण शिरसाठ, मनोज गायकवाड, राहुल अरगडे, विकी शिंदे, सोमनाथ रोकडे, दिलीप अरगडे, गोविंद राउत, संदिप दळवी विवेक फंड, श्वेतांबरी राउत आदि उपस्थित होते.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, राजर्षी शाहु महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वंचितांच्या हाती लेखणी देवुन त्यांना सुशिक्षीत करण्यांचे महान कार्य केले. राष्ट्रसंत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी देखील समाजातील अनिष्ठ प्रथा-चालीरितींवर प्रहार करत जनजागृती करून स्वच्छता नसेल तर रोगराईतुन संपुर्ण विश्व विनाशाच्या दिशेने वाटचाल करू शकते असा संदेश देत स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. कोरोना विश्वमहामारीमुळे आपले काय हाल झाले हे सर्वांनी अनुभवले आहे, तेव्हा स्वच्छता ही कितीही कष्ट पडले तरी केली पाहिजे, आपला परिसर, प्रभाग, शहर, गांव, तालुका, जिल्हा, राज्य,देश स्वच्छ ठेवले पाहिजे. संपुर्ण हगणदारीमुक्त गांव संकल्पनेत संत गाडगेबाबांनी जो विचार दिला तो आपल्या देशाला जागतिक महासत्तेच्या दिशेने घेवुन जाणारा असल्याचे त्या म्हणाल्या.

फोटोओळी-
कोपरगांव शहरातील गजानन नगर भागात परिट बांधवांच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यांत आली त्याप्रसंगी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते महाआरती करण्यांत आली.
