
कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांत गाई फिरतांना दिसतात. काही गाई घोळक्याने रस्त्यांवर बसलेल्या आढळतात. त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होतात. अनेकदा काही गायी उधळल्याने अपघातही होतात, नागरिक जायबंदी झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. नगरपरिषदेने अनेकदा शहरात भटकणाऱ्या गायींना पकडून कोकमठाण येथील गोशाळेत व कुंभारी येथे आदरणीय उंडे महाराजांच्या गो शाळेतही ठेवल्या. तरी आजही शहरात अनेक गाई फिरतांना दिसतातच. गायींच्या मालकांनी आपापल्या गाई स्वतःच्या घरी-आवारात बांधून ठेवल्या पाहिजेत. अन्यथा अशा गायी जप्त करून गायींच्या मालकांवर गुन्हा दाखल करावा लागेल. गायीचे दुध काढून घ्यायचे व नंतर त्याच गायीला कचरा, प्लास्टिक खायला शहरांत मोकाट सोडून देण्याचा नादान बेजबाबदारपणा योग्य नाही. संबंधितांना जबाबदारीची जाणीव का नाही? याच गायी उधळल्याने एखाद्या दिवशी अपघातात तुम्हीही जायबंदी होऊ शकता, निदान याची तरी भिती बाळगा. त्याचप्रमाणे डुकरांच्या मालकांनीही डुकरांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे अपघात होतात- अनेकांना डुकरे चावा घेतात. आता डुकरांच्या मालकांवर गुन्हे तर दाखल होतीलच, पण परराज्यातील ठेकेदार बोलावून सर्व भटकी डुकरे जप्त करून नेली जातील हे लक्षात घ्यावे. कुत्री पकडण्याचेही काम सुरूच आहे. सर्वांनी सहकार्य करावे. गायी-डुकरे जप्त केल्यास तथाकथित समाजसेवकांनी व प्राणीमित्रांनी त्यांच्या मालकांची वकिली करण्यास नगरपरिषदेत येऊ नये हीच अपेक्षा व विनंती. कारण नगरपरिषद निवडणूक जवळ आल्याने अनेक नवे उत्साही समाजसेवक प्रसिद्धीची संधीच शोधतांना दिसत आहेत. नगरपरिषदेच्या प्रत्येक कामाजवळ जाऊन फोटो काढायचे व आमच्यामुळेच काम होत आहे असा कांगावा करत अनेकजण फिरताहेत हेही जनतेने लक्षात घ्यावे.
