
कर्मवीर काळे कारखान्याचा ६७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांनी शासनाने जाहीर केलेल्या ऊस दारच्या एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला असून प्रत्यक्ष बाजार भावापेक्षा सवलतीच्या दरात सभासदांना साखर दिली आहे. त्याबाबत जादा दिलेला ऊस दर व प्रत्यक्ष बाजार भावापेक्षा सवलतीच्या दरात दिलेली साखरेच्या दरातील फरकाची रक्कम नफा म्हणून ग्राह्य धरून आयकर विभागाने आयकर भरावा अशी भूमिका घेवून सर्वच सहकारी साखर कारखान्यांना आयकराच्या नोटीसा पाठविल्या आहेत. अगोदरच सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असतांना आयकर विभागाचे मोठे संकट सहकारी साखर कारखानदारीपुढे उभे आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांची अडचण ओळखून खाजगी कारखान्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली रक्कम व्यावसायिक खर्च म्हणून ग्राह्य धरणे संदर्भात कायद्यामध्ये योग्य ती सुधारणा करून आयकराचा प्रश्न केंद्र शासनाने कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा २०२१/२२ या वर्षाच्या ६७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मागील हंगाम २०२०२१ मध्ये ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या प्रगतीशील ऊस उत्पादक सभासद शेतकरी आप्पासाहेब पुंजाजी आगवन व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुवर्णाताई आगवन, पांडुरंग कारभारी सांगळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सरूबाई सांगळे तसेच आण्णासाहेब लक्ष्मण पानगव्हाणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निर्मलाताई पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजा करून कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत साध्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात पार पडला याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सदर आयकराचा विषय जुना असून त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. दि. ५ मार्च २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देवून संबधित असेसिंग ऑफिसर यांनी (Faceless Assessment) करून पूर्वी प्रमाणेच ऑर्डर केलेली आहे. त्यासंदर्भात साखर संघामार्फत केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. आयकराचा हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी सहकारी साखर कारखानदारीच्या अडचणींची सखोल जाणीव असणाऱ्या शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्वत: लक्ष घालावे याबाबत त्यांच्याकडे आग्रह धरणार आहे.
मागील दोन वर्षापासून समाधानकारक पाऊस झाल्याने कार्यक्षेत्रात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. मागील वर्षी गोदावरी कालव्यांचे रोटेशन वेळेत दिल्यामुळे संपूर्ण उन्हाळी हंगामात ऊसपिकांना पाण्याची टंचाई जाणवली नाही. चालू हंगामात कारखाना कार्यक्षेत्रात उस उपलब्धता समाधानकारक राहील. कार्यक्षेत्र तसेच पुणतांबा गटातील गावे व कार्य क्षेत्रालगत निफाड तालुक्यातील खेडले झुंगे, रुई, धानोरे आदी गावातूनच ऊस गाळप उद्दिष्टाइतका ७.०० लाख मे.टन उस उपलब्ध होईल असा शेतकी विभागाचा अंदाज आहे. त्यामुके साहजिकच पारंपारिक गेटकेन ऊसाचे कार्यक्षेत्रात यावर्षी जाता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. चालू हंगामापासून कारखान्याच्या शेतकी विभागाने कामकाजाबाबत नवीन सॉफ्टवेअर ऑनलाईन प्रणाली घेतलेली आहे. स्मार्ट मोबाईलच्या सहाय्याने जीपीएस प्रणालीचा वापर करून ऊस प्लॉटची मोजणी व ऊस नोंद हि शेतकऱ्यांच्या शेतामधूनच केली जाणार आहे. उसतोडणी कार्यक्रम हा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने वजन काटा विभागास जोडला जाणार आहे. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टॅगिंग करून रीडरमार्फत यार्डामध्ये वाहनांचे क्रमवार नंबर लावणे व क्रमवारी प्रमाणे खाली होणार असून संगणक व मोबाईलचा वापर करून शेतकी विभाग पेपरलेस कामकाज करणे संदर्भात कार्यवाही सुरु आहे. कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली ओसरली असली तरी कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या गळीत हंगामात आपण जी काळजी घेतली आहे ती काळजी यापुढे देखील घेवून गळीत हंगाम यशस्वी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे सन २०२१/२२ या वर्षाच्या ६७ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ देखील साध्या पद्धतीने व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार हा कार्यक्रम संचालक मंडळ व कारखाना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
चौकट :- साखर कामगारांना वेतनवाढ करणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना राज्यात पहिला.
कामगार वेतन वाढीबाबत आ. आशुतोष काळे आग्रही होते. महाराष्ट्र शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समितीची नियुक्ती केलेली आहे. मागील वर्षीच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी त्रिपक्षीय समिती कराराची मुदत संपून बरेच दिवस झाले असून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली होती. सदर समितीची अंतिम बैठक मागील महिन्यात दि. ९/९/२०२१ रोजी झाली असून या बैठकीत साखर कामगारांना बैठकीत १२% वेतन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कराराप्रमाणे माहे ऑक्टोंबर २०२१ पासून वेतनवाढ करण्यात येणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी जाहीर करून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सर्वप्रथम वेतनवाढ लागू केली असून राज्यात साखर कामगारांना वेतनवाढ देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना राज्यात पहिला ठरला आहे. त्याबद्दल कोपरगाव साखर कामगार सभेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो ओळ:- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी मा.आ. अशोकराव काळे.आ. आशुतोष काळे, व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम व संचालक मंडळ आदी.
