कोपरगाव प्रतिनिधी:-
युवकांना राजकीय भविष्य आहे, कार्यकर्ता हा लढणारा आणि ताकदीने घडणारा पाहिजे. कुणाला अचानक काही मिळत नसतं, संघर्ष कार्यकर्त्याला घडवतो आणि त्यातूनच उद्याचे नेतृत्व तयार होत असतं त्यासाठी प्रत्येकाने संघटन कौशल्य वाढवून भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करावे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव शहर आणि तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या जम्बो कार्यकारणी नियुक्त्या शुक्रवारी करण्यात आल्या त्याप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. प्रारंभी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम पाचोरा, शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भारतमाता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी सभापती मच्छिंद्र टेके, संचालक साहेबराव कदम, विश्वासराव महाले, प्रदीप नवले, केशव भवर बाळासाहेब वक्ते, उत्तम चरमळ, रिपाईचे दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी चिपळून पूरग्रस्त, कोरोनात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली, संयुक्त राष्ट्र संघाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपान टोकियो ऑलम्पिक मध्ये मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन), लवलिना बोर्गोहाईन (बॉक्सिंग), भारतीय पुरूष संघ (हॉकी), रविकुमार दहीया (कुस्ती) या खेळात पाच पदक मिळवल्याबद्दल तसेच खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांचे नावे दिला जाणार असल्याबद्दलचा अभिनंदनाचा व गोदावरी कालव्याद्वारे शेतीला पाणी द्यावे असे ठराव मांडले.
भाजपा पदाधिकारी होणे ही समाजकार्याची संधी असल्याचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, वन बूथ फिफ्टी युथ जोडा असं साहेबराव रोहोम, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपला उच्च पदावर नेलं तसे युवकांनी मिळालेल्या पदाची शोभा उच्च पदापर्यंत पोहोचवा असं विश्वासराव महाले, तर माजी सभापती मच्छिंद्र टेके यांनी विरोधक कपटकारस्थानात तरबेज असून वीज, पाणी आणि शेतीचे असंख्य प्रश्न अडचणीचे आहेत. त्यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत, तेव्हा युवक व कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेऊन संघर्ष करून पक्ष संघटन वाढवले पाहिजे असे सांगितले
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोपरगाव विधानसभा मतदार संघात विरोधकांचे कुठलेच काम नाही, मात्र त्यांची गोबेल्स निती आपल्याला फसवत आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून द्या. विकासाची सगळी काम आपलीच असून लोकप्रतिनिधी उद्घटनासाठी नारळ शोधत आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या आजवरच्या कामांचा युवकांनी अभ्यास करा आणि त्यावरील चर्चेतून विरोधकांची बोलती बंद करा. यांठिकानी ज्या नियुक्त्या झाल्या त्यांनी आजपासूनच पक्षसंघटन वाढवायला सुरुवात करावे व जेथे जेथे अडचणी येतील तेथे तेथे आमची मदत घ्यावी. कोरोना महामारीत युवानेते विवेक कोल्हे यांनी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून हजारो रुग्णांना मदत केली, प्राणवायूसह औषधे मिळवून दिलीअसे त्या म्हणाल्या. शेवटी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी आभार मानले.

फोटो ओळी :- कोपरगाव
कोपरगाव शहर आणि तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या जम्बो कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली, यात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
