

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- सोमवार (दि. ११) पासून कोपरगाव येथे मराठा समाज बांधवांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु केलेल्या आमरण उपोषणाची ताडीने दखल घ्या अशी विनंती आ. आशुतोष काळे यांनी पालक मंत्र्यांना केली होती. त्या विनंतीवरून शुक्रवार (दि.१५) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्या मराठा समाज बांधवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेतून पालक मंत्र्यांच्या आश्वासना नंतर आमरण उपोषण लिंबू पाणी घेवून सोडण्यात आले.
कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ मागील पाच दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील ५ दिवसांपासून अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घ्यावी याकडे आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे देखील लक्ष वेधले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे शुक्रवार (दि.१५) रोजी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची विनंती आ. आशुतोष काळे यांनी केली होती. त्या विनंतीची पालक मंत्र्यांनी दखल घेवून उपोषणस्थळी येवून उपोषणकर्त्या मराठा समाज बांधवांशी सकारात्मक चर्चा केली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे हि महायुती शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी सर्व बाजूनी कायदेशीर अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महायुती शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे अशी पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची विनंती उपोषणकर्त्यांनी मान्य करून प.पु.संत रमेशगिरी महाराज व लहान मुलींच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन आमरण उपोषण सोडले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, प्रदीप देशमुख आदींसह कोपरगाव तालुका सकल मराठा समाज समितीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
