आमटी भाकरीचा गोपालकाला भाविकांना भावला…
कोपरगांव प्रतिनिधी:-
भगवंत हा भावाचा भुकेला आहे, तर अखंड हरिनाम सप्ताहासाठी येणारा भाविक श्रध्देबरोबरच प्रसादाचा भुकेला असतो, त्यासाठी श्रीक्षेत्र कोकमठाण नगरीत १७५ व्या सप्ताहात भाकरी आणि आमटीचा प्रसाद मिळाला की त्याचा स्वाद आणखीनच वाढतो, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशीही पाकगृहातील आमटी तयार करण्याच्या कामात स्वतः मदत करत भाविकांचे उदरभरण करण्यात प्रसन्नता मानली. सप्ताहाच्या आमटीचा स्वाद काही औरच असतो., घरच्या आमटीला कितीही चीज वस्तू घातल्या तरी त्याची सर आणि चवही येत नाही., हा गोपाल काला भाविकांना भावला आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्यांने विवेकभैय्या कोल्हे यांनी युवकांचे संघटन हाती घेतले. त्यांचे सर्व शिक्षण वसतीगृहात झाल्याने त्यांना सप्ताहाच्या सगळ्या गोष्टी तशा नविन आहेत, पण ते येसगांवसारख्या ग्रामीण भागातील असल्याने सुट्टीला घरी आल्यावर याची माहिती व्हायची.
कोपरगांव विधानसभा मतदार संघातील श्रीक्षेत्र कोकमठाणला ऐतिहासिक प्राचिन वारसा आहे. पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर, ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांची तीनखणी, लक्ष्मी माता देवयानी, त्याचप्रमाणे जंगलीदास माऊलींचा मोठा आश्रम आणि भक्त परिवार कोकमठाण क्षेत्रातच आहे. गुरु शुक्राचार्य यांची कोपरगांव बेट भुमी तपश्चर्येची. शेजारीच तेरा किलोमीटर अंतरावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साईबाबांचे मंदिर, दक्षिणवाहिनी पवित्र गंगा गोदावरी नदी, राजा दशरथ यांच्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे जनक संवत्सर येथील शृंगऋषी, महानुभाव पंथीय चक्रधर स्वामी त्यामुळे पावणेदोनशे परंपरेतील कोकमठाण अखंड हरिनाम सप्ताहाला विशेष महत्व आहे. त्यातच भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्यांने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाला जसा तिरंग्याचा साज चढला आहे, तसा वारकरी भाविकांच्या भक्तीच्या ध्वजाचा साज हरिनाम सप्ताह ला चढला आहे.
प.पू. गंगागिरी महाराज यांनी अन्नपुर्णा देवतेचे महत्व जाणत भुकेल्यांच्या पोटी दोन घास सुखाने जावे या भक्तीतून अखंड हरिनाम सप्ताहातून अन्नदानाचे महत्व भाविकापर्यंत नेले, आज हया घटनेला १७५ वर्ष पूर्ण झाली. सरलाबेटाचे नारायणगिरी महाराजांनी या कार्याची धुरा महंत रामगिरी महाराजांवर सोपवली.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षे अखंड हरिनाम सप्ताहाला मर्यादा होत्या पण याही संकटातून सर्वांची सही सलामत सूटका करणारा परमेश्वरच आहे. त्यानेच कोकमठाण पंचक्रोशीवासीयांना या सेवेची संधी दिली.
हया अखंड हरिनाम सप्ताहातील महंत रामगिरी महाराजांची वाणी श्रवण करून लाखो भाविक सप्ताहाची आमटी भाकरी मिळावी हीच माफक अपेक्षा ठेवत असतात. आसपासच्या सर्व गावातून ट्रक-ट्रॅक्टरच्या सहाय्याने येथे भाकऱ्या, चपात्यांचा ढीग जमा होतो. हया भाकऱ्या कुसकरून त्यावर अखंड हरिनामाची रसरशीत आमटी टाकली की, त्या भोजनाचा स्वाद काही निराळाच येतो.
पंढरीच्या पांडुरंगाच्या पायी वारीची भुरळ जशी आय.टी. क्षेत्रातील अभियंत्यांना घातली गेली आहे, तशीच भुरळ गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाने घातली. या स्थानावर आय.टी क्षेत्रातील उच्चपदस्थ अभियंते येऊन येथे जी सेवा वाटयाला येईल ती करत आहे.
विवेकभैय्या कोल्हे हे बी. ई. सिव्हील अभियंते आहेत, त्यांना या कामात निराळा आनंद मिळत आहे. त्यामुळे कोकमठाणच्या १७५ व्या हरिनाम सप्ताहाच्या नियोजनापासून ते ९ ऑगस्ट रोजीच्या सांगता सोहळ्याच्या तयारीत कुठेही बुंदीचा महाप्रसाद कमी पडायला नको म्हणून बुंदी तयार करायाच्या कामातही ते स्वतः मदत करुन पाककलेचा आनंद घेत आहेत. साप्ताहात बाल सवंगड्यापासून ते अबाल वृद्ध, नव्वदी, शंभरी गाठलेल्या वृद्धांचे पोट भरले पाहिजे याची ते काळजी घेत आहेत हे सर्व काम सामूहिक जबाबदारीचे असून त्यांच्या साथीला पंचक्रोशीतील अहमदनगर जिल्ह्याबरोबरच शेजारच्या नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने हातभार लावत आहेत हे विशेष. विवेकभैय्या कोल्हे हे स्वतः प्रत्येक दिवशी हजेरी लावून नियोजनात काय कुठे कमी आहे याची माहिती घेऊन त्यावर काम करीत आहेत. त्यामुळे आपोआपच त्यांच्या सहकारी युवकांचा देखील उत्साह वाढला आहे., तेही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. या सप्ताहाची जागतिक स्तरावरील रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.


फोटो ओळी:-कोपरगाव
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण (कोपरगाव) येथील गंगागिरी महाराजांच्या 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहात पाकगृहातील आमटी व महाप्रसादासाठी बुंदी तयार करण्याच्या कामात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे स्वतः मदत करून भाविकांचे उदरभरण करत आहेत.
