कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- ठिबक सिंचन शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना जवळपास ७५ ते ८० टक्के अनुदान दिले जाते. मात्र कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान आजवर ५० टक्केच दिले जात होते. त्याबाबत निवडून आल्यापासून कोपरगाव तालुक्याला देखील इतर तालुक्याप्रमाणे ७५ ते ८० टक्के अनुदान मिळावे यासाठी आ. आशुतोष काळे यांचा कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून यापुढे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील इतर तालुक्यांप्रमाणे ठिबक सिंचनचे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के व बहुभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान मिळणार आहे अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
ठिबक सिंचन हि काळाची गरज असून आज प्रत्येक शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने शेती करत आहे. ठिबक सिंचन शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडूनही जनजागृती करून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. या योजनेचे सर्व शेतकरी लाभ घेवू शकतात. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धत फायद्याची असून त्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच इतरही अनेक फायदे असल्यामुळे बहुतांश शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने शेती करीत आहे. कोपरगाव तालुक्यातील देखील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने शेती करीत असले तरी या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मात्र ५० टक्केच मिळत होते. दुसरीकडे शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र हेच अनुदान ७५ ते ८० टक्के मिळत होते.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी अन्याय झाल्याची भावना होती. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांची भेट घेवून याबाबत आपण लक्ष घालून शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी केली होती.
त्यावेळी कोपरगाव शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कृषी खात्याकडे पाठपुरावा करून कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांची भेट घेवून कोपरगाव तालुक्यातील कालव्यांच्या आवर्तनाबाबत सविस्तर माहिती देवून इतर तालुक्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील ठिबक सिंचनचे शासन नियमानुसार ७५ ते ८० टक्के अनुदान मिळावे अशी मागणी करून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळाले असून राज्य शासनाच्या कृषी विभागाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे ठिबक सिंचनाचे ७५ ते ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून रखडलेल्या शेततळ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे व त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे ७५ ते ८० टक्के अनुदान देण्याचा घेण्यात आलेला निर्णय महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांप्रती अत्यंत संवेदनशील असल्याची प्रचीती येत असून शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार व आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. यावेळी शेतकरी व ठिबक सिंचन संच व्यावसायिकांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राजेंद्र खिलारी, भाऊसाहेब मोरे,राजेश ठोळे, बाळासाहेब भंडारी, सुनील शिलेदार, प्रा. अंबादास वडांगळे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा ७५ ते ८० टक्के अनुदानाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना शेतकरी ठिबक सिंचन संच व्यावसायिक.
