सर्वसामान्य नागरिकांसह छोटे-मोठे व्यावसायिक व व्यापारी असोसिएशनचे मोलाचे सहकार्य; जिल्ह्यासह कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी मागील ५४ दिवसांपासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मागील वर्षीचा अनुभव पाहता लॉकडाऊन कधी संपणार अशी सर्व सामान्यांना चिंता पडली होती. मात्र कोपरगाव तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यापारी व व्यापारी असोसिएशन यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यातून जिल्ह्यासह कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात आमदार आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट अतिशय घातक होती. सातत्याने बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन हा योग्य पर्याय नसला तरी अंतिम पर्याय तेवढाच शिल्लक राहतो त्यामुळे शासनाला शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला त्यामुळेच आपण दुसऱ्या लाटेवर वर्चस्व मिळवू शकलो हे नाकारून चालणार नाही. लॉकडाऊनमुळे ज्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम होऊन त्यांचे अर्थचक्र थांबले होते अशाही परिस्थितीत यासर्व घटकांनी दाखविलेल्या संयमाबद्दल त्यांचे आभार मानणे गरजेचे आहे.

       कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले आर्थिक नुकसान भविष्यात भरून येईलही मात्र या दुसऱ्या लाटेत अनेक स्वकीयांना आपण गमावले. तालुक्यात अनेकांना कोरोना विषाणूने आपल्यापासून हिरावून घेतल्याचे दु:ख आयुष्यात कधीही न विसरणारे आहे. सर्वांच्या सहकार्यांने आपण अतिशय कमी वेळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे साहजिकच लॉकडाऊन संपुष्टात येऊन कोपरगाव तालुका अनलॉक झाल्याचे एकीकडे मोठे समाधान मिळत असले तरी दुसरीकडे तालुक्यातील जिवाभावाची माणसं आज आपल्यात नाही याचे मोठे दु:ख आहे.
               दुसऱ्या लाटेचे आक्रमण रोखण्यासाठी आपण सर्वोतोपरी उपाययोजना केल्या होत्या. त्याप्रमाणेच तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी देखील आपण सज्ज आहोत. मात्र जे आपण दुसऱ्या लाटेत भोगलंय अशी वेळ तिसऱ्या लाटेत येऊ नये यासाठी सर्वांनी सजग राहावे. जेणेकरून यापुढे सर्वांनाच अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याची  वेळ येणार नाही. आपण आजपर्यंत जो संयम दाखविला, जे सहकार्य केले त्या बळावरच आपण कोरोनावर बहुतांशी मात करू शकलो.

          चौकट :- “ राजकारणाची एक पातळी ठरलेली असावी. राजकारण कुठे, कधी, किती करावे याला एक मर्यादा आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढण्यापूर्वीच उपाययोजना करण्याच्या उद्देशातून जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले. त्यावेळी जीवघेण्या संकट काळात देखील राजकारण करून कोविड केअर सेंटर बाबत बालिश वक्तव्य करून व हस्तकांकरवी प्रसिद्धीपत्रक काढून राजकारण केले गेले. याकाळात तालुक्यातील गोरगरीब जनतेला मदत करून दिलासा देण्याचे काम करायचे सोडून आजूबाजूच्या तालुक्यात फेरफटका का मारीत होते हा प्रश्न अजूनही माझ्यापुढे अनुत्तरित आहे. तालुक्यात कोरोना पेक्षाही घातक खालच्या दर्जाचे राजकारण करण्याचा पारंपरिक व्हायरसला योग्य वेळी औषधोपचार करणार”

–आमदार आशुतोष काळे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *