Uncategorized

दुष्काळाचे सावट हटू दे, बळीराजा सुखी होवू दे आ. आशुतोष काळेंची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना…

कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण राज्यात चालूवर्षी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. कोपरगाव मतदार संघात जवळपास मागील दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत.अस्मानी संकटाला न घाबरता बळीराजा नेहमीच मोठ्या धाडसाने व हिमतीने प्रत्येक संकटाला सामोरे गेला आहे. त्यामुळे जरी आजपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसला तरी यापुढील काळात कोपरगाव मतदार संघासह संपूर्ण राज्यात भरपूर पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट हटू दे आणि बळीराजा सुखी होवू दे अशी प्रार्थना सर्व गणेश भक्तांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी विघ्नहर्त्याच्या चरणी केली.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सव उपसमितीच्या वतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून त्यानिमित्ताने श्री.सत्यनारायण महापूजा कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या शुभ हस्ते पार पडली यावेळी ते बोलत होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंडळाचे हे ७२ वे वर्ष असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, गणपती बाप्पा हे १४ विद्या आणि ६४ कलांचे अधिष्ठाता असून, संकटसमयी भक्तांच्या पाठीशी उभे राहणारे विघ्नहर्ते दैवत आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, पिकांवर आलेले संकट आणि दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अशा या कठीण प्रसंगी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर कृपादृष्टी राहावी, राज्यात सर्वदूर परतीचा दमदार पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि बळीराजाच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी यावी, अशी प्रार्थना राज्यातील शेतकरी व सर्व गणेशभक्तांच्या वतीने केली आहे.
यापूर्वीही काही वर्षी सुरुवातीला जरी पाऊस पडला नाही तरी परतीच्या पावसाने कसर भरून काढलेली आहे.तसेच गणरायाच्या आशीर्वादाने कोणतेही संकट कायमचे राहत नाही; त्यामुळे विघ्नहर्ता गणपती बाप्पा शेतकऱ्यांवर आलेले हे आरिष्ट दूर करून दुष्काळाचे सावट नक्की दूर करील आणि बळीराजाच्या कष्टाला सुखाचे,समाधानाचे दिवस मिळवून देईल,असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद,असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ, विविध विभागाचे खाते प्रमुख, गणेशोत्सव उपसमितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, कारखाना व सर्व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो ओळ-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सव निमित्त आयोजित श्री.सत्यनारायण महापूजा प्रसंगी आमदार आशुतोष काळे, सौ.चैतालीताई काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *