
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यामध्ये उसपीक आणि फळबागांचे प्रमाण मोठे असुन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि जलसंपदा विभागाच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे वेळेवर पाणी मिळाले नाही, त्यामुळे बळीराजाला मोठा फटका बसला असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केली.
सध्या कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. लाॅकडाउन सुरू आहे. या परिस्थितीमुळे मोठया आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे. यातून शेतक-यांनाही मोठा आर्थीक फटका सहन करावा लागत आहे. पदरमोड करून पिके उभी केली, ऐन बहरात असलेल्या पिकांना पाण्याची गरज असतांना तसेच धरणातही मुबलक पाणी साठा असतांना लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आणि जलसंपदा विभागाच्या गलथान नियोजनामुळे वेळेवर पाणी मिळू शकले नाही, त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
वास्तविक धरणात मुबलक पाणी आहे, पिकांनाही पाण्याची आवश्यकता असतांना लोकप्रतिनिधींनी योग्य नियोजन करून वेळेवर पाणी मिळवून देण्याची जबाबदारी होती, परंतु केवळ बैठकांचा देखावा करून,शेतक-यांविषयींचा कळवळा दाखविण्याचे काम केले. त्यामुळे मतदार संघातील बळीराजा पाण्यापासून वंचित राहिला. ही खंतही श्री रोहोम यांनी व्यक्त केली.
