राजकारण विकासाचे करतो आणि जे करतोतेच जनतेसमोर मांडतो :- आमदार आशुतोष काळे…

Uncategorized

१३.३७ कोटी निधीतून डाऊच,हिंगणी व शिंगवे केटीवेअरच्या पूर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- राजकारणात फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागील सहा वर्षात विकासकामांवर भर देवून दशकानुदशके प्रलंबित असलेली विकास कामे पूर्ण केली असून राजकारण विकासाचे करतो आणि जे करतो तेच जनतेसमोर मांडतो असे स्पष्ट मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले आहे.
आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत १३.३७ कोटी रुपये निधीतून कोपरगाव मतदारसंघातील डाऊच, हिंगणी व शिंगवे येथील गोदावरी नदीवरील केटीवेअरजवळ पूर संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन व पी एम श्री जिल्हा परिषद शाळा शिंगवे येथील आयडियल संगणक कक्ष व गोदावरी इक्युपमेंट्स प्रा.लि. यांच्या वतीने दुरुस्त करण्यात आलेल्या शाळा खोल्यांचे लोकार्पण रविवार (दि.१५) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मंजूर बंधारा वाहून जाण्यापूर्वीच त्या बंधाऱ्याच्या देखभालीची जबाबदारी आपल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे देण्याची मागणी केली होती पंरतु ज्यांच्याकडे देखभालीची जबाबदारी होती त्यांनी नकार दिल्यामुळे मंजूर बंधारा तीन वेळा वाहून गेला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पण वाहून गेल्या. तशीच परिस्थिती पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यानंतर डाऊच, हिंगणी व शिंगवेच्या बंधाऱ्याची होवू नये यासाठी या बंधाऱ्यांच्या संरक्षक भिंत बांधण्यासाठी महायुती शासनाकडून १३.३७ कोटी रुपये निधी आणला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांना कोणताही धोका राहणार नाही.

मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवत असतो मात्र ज्यांचा या कामांशी काहीही संबंध नाही त्या व्यक्ती हे काम आम्हीच केले असे खोटे सांगून नागरीकांची दिशाभूल करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत नागरीकांना अपेक्षित असलेली विकासकामे पूर्ण केली आहेत आणि यापुढील काळातही विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. या व्यतिरिक्त तुमच्या मनात विकासाच्या ज्या संकल्पना असतील तर त्या अवश्य सांगा त्या संकल्पना पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

चौकट :-१३.३७ कोटी निधीतून हिंगणी केटीवेअरच्या खालील बाजूस नदीच्या डाव्या व उजव्या तिरावर संरक्षक भिंत बांधणे, डाऊच येथे केटीवेअरच्या खालील बाजुस नदीच्या उजव्या व डाव्या तिरावर संरक्षक भिंत बांधणे आणि शिंगवे (ता. राहाता) येथे केटीवेअरच्या उर्ध्व बाजूस नदीच्या उजव्या तिरावर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. या संरक्षक भिंतींमुळे अतिवृष्टी काळात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गावात जाण्यापासून रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.त्यामुळे नागरीकांच्या मालमत्तेचे होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे त्यामुळे डाऊच, हिंगणी व शिंगवे येथील ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *