
कोपरगांव प्रतिनिधी:-
वाढते भूवैश्मीकीकरण आणि पर्यावरणातील बदलामुळे उस पिकासह अन्य पिकावर हुमणी किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणांत वाढला आहे तेंव्हा शेतक-यांनी त्याच्या नियंत्रणासाठी प्रकाशगंध सापळयांचा वापर वाढवावा असे आवाहन शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, भारतीय उस संशोधन संस्था लखनौ व जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगरच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्षेत्रातील मागासवर्गीय प्रवर्गातील उस उत्पादक सभासद शेतक-यांसाठी हुमणी किडीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना विषयी एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यांत आला त्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे होते.
प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. आयसीआर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कारखान्याच्या उस विकास विभागाचे संदिप गवळी यांनी प्रास्तविकात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतक-यांचे उत्पादन वाढीसाठी व विविध किडींच्या बंदोबस्तासाठी राबवित असलेल्या उपाययोजनाविषयी माहिती दिली.
जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगरचे शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे यांनी केंद्र व राज्य शासन अंतर्गत मागासवर्गीय शेतकरी बांधवासाठी कृषीविषयक योजनांची माहिती देवुन उस पिकात पाकळी व लोकरीमाव्याचा प्रार्दुभाव वाढला त्याच्या उच्चाटनासाठी प्रवरानगर येथे १९७८ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यांत आली आहे.
डॉ. योगेश थोरात पुढे म्हणांले की, एक हुमणी मादा ५० ते ६० अळयांना जन्म देते त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर उत्पादनांत ८० ते ९० टक्के घट येते. वातावरणांतील बदलामुळे उस पिकासह अन्य पिकांवर हुमणीसह अन्य किडींचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्याबाबत वेळीच जनजागृती झाली नाही तर शेतक-यांचे अपरिमीत नुकसान होते ते टाळण्यासाठी प्रत्येकांने कॉम्बो ट्रॅप प्रकाशगंध सापळ्यांचा वापर करावा. उपस्थित शेतक-यांच्या शंकांचे यावेळी निरसन करण्यांत आले.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. आप्पासाहेब दवंगे, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बारहाते, सतिष आव्हाड, संजय औताडे, कार्यकारी संचालक सुहास यादव यांच्यासह खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, उस उत्पादक सभासद शेतकरी मोठया संख्येने हजर होते. आभार व सुत्रसंचलन संदिप गवळी यांनी केले.
