

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
रॅगींगमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाद होतात, मानसिक नैराश्यात जातात त्यामुळे शिक्षणावर परिणाम होतो. पदव्युत्तर महाविद्यालयात आलेले विद्यार्थी हे समजुतदार असतात. आपले पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी हे ध्येयवेडे आणि करिअर ओरियंटेड असल्याने ते कधीच रॅगींगच्या फंदात पडत नाहीत ही एक कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी एकमेकांबरोबर प्रेमाने आणि सहकार भावनेने वागावे. यामुळे विद्यार्थी जीवन आनंदी होते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भणगे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. सुनील भणगे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा आंतरविद्याशाखा जलव्यवस्थान विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ, क्रीडा अधिकारी डॉ. बाबासाहेब भिंगारदे, सहाय्यक कुलसचिव गोविंद तागड उपस्थित होते.
यावेळी डॉ. विजय पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तीचे पालन करून कोणतेही बेजबाबदार कृत्य न करण्यासाठी सूचित केले. येणार्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयात नव्याने येणार्या विद्यार्थ्यांबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याविषयीही काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी रॅगिंग म्हणजे काय, अँटी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली व या सर्व माहितीचे पावर पॉइंटद्वारे सादरीकरण केले. याप्रसंगी डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगींगची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास आवारी यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब भिंगारदे यांनी मानले. यावेळी पदव्युत्तर महाविद्यायलयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
