पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्याआ. आशुतोष काळेंची पालकमंत्री विखे पाटलांकडे मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :-मागील वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे कोपरगाव मतदार संघात दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून पूर्व भागातील व वरच्या भागातील बहुतांशी गावात नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील कोपरगाव दौऱ्यावर आले असता आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या पाणी प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधून समस्या मांडल्या. ते म्हणाले की, निळवंडे कालव्याच्या चाचणीतून केलेल्या मागणीनुसार निळवंडे डाव्या कालव्याला अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी मिळाले. त्यामुळे वरच्या भागातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना फायदा होवून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होवून आजपर्यंत पाणी पुरले. परंतु उन्हाचा चटका वाढत चालल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.त्यामुळे निळवंडे कालव्यातून या गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे. अशीच काहीशी परिस्थिती पूर्व भागातील गावांची देखील झालेली आहे. या भागातील नाटेगांव, आंचलगांव, ओगदी, पढेगांव, कासली, दहेगांव बोलका, शिरसगांव-सावळगांव, तिळवणी, आपेगांव, उक्कडगांव, तळेगांव मळे या भागात भू-गर्भाची पाणी पातळी खालावली जावून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावात देखील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. सध्या पालखेड कालव्याचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरु असून या आवर्तनातून या गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्यावे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
तसेच गोदावरी कालव्यांचे पाणी पाणी कमी झाल्यामुळे लाभक्षेत्र उजाड होत आहे. अशा परिस्थितीत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर एकामागून एक संकटे चालून येत असून हे संकटे थांबण्याचे नाव घेत नाही एका संकटाशी संघर्ष सुरु असतांनाच दुसरे संकट उभे राहत आहे. दुष्काळी परिस्थितीत समन्यायीचे भूत अगोदरच गोदावरी कालव्यांच्या मानगुटीवर बसलेले असून त्याचा परिणाम मिळणाऱ्या आवर्तनावर होत असल्यामुळे लाभक्षेत्रावर मोठा अन्याय झाला आहे. होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रत्येक अधिवेशनात आवाज उठविला आहे मात्र सरकार कोणतेही असो सातत्याने नगर-नाशिकच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी नियमित बैठका घेवून हा अन्याय दूर करावा. वक्राकार दरवाजाच्या माध्यमातून पुन्हा एक नवीन संकट गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राला ओव्हर फ्लोच्या पाण्यापासून वंचित ठेवू पाहत आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावर १० वक्राकार दरवाजे बसविले जाणार असल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोच्या पाण्यापासून मुकावे लागू शकते त्याबाबत मी जाहीर भूमिका घेतली आहे आपण देखील यामध्ये लक्ष घालावे.
गोदावरी कालव्याचे सिंचनाचे आवर्तन आटोपले असून धरणात आज रोजी जवळपास साडे तीन ते चार टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तना बरोबरच सिंचनासाठी देखील आवर्तन होवू शकते त्याबाबत देखील आपण गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली. त्याबाबतची लेखी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अहमदनगर व नाशिक,पाटबंधारे विभाग नाशिक व छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *