हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन ; निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार महत्वाचा:- अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
पाश्चात संस्कृतीमुळे तरुण वर्ग फास्ट फुडकडे आकर्षित होत आहे. फास्ट फुडमुळे आरोग्याची हानी होती. आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या सकस आहाराची जोड दिलेली आहे. विद्यार्थीनींनी आहारामध्ये फळे, भाजीपाला, पौष्टिक तृणधान्ये, कॅलशिअम आणि लोहयुक्त पदार्थांना प्राधान्य द्यावे. आहाराबारोबर योगाही तेवढाच गरजेचा आहे. निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार महत्वाचा असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यापीठ दवाखान्यात विद्यार्थीनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करतांना अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे बोलत होते. याप्रसंगी कुलगुरु यांचे विशेष कार्य अधिकारी तथा आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिले, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते.


यावेळी डॉ. महानंद माने मार्गदर्शन करतांना म्हणाले की आत्ताच्या तरुण पिढीमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता जाणवते ज्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी योग्य आहार, नियमीत रक्त तपासणी व वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. वैशाली हिले मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की ॠतुनुसार आहार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यावेळी पदव्युत्तर महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येवून त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या हिमोग्लोबीन तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कु. प्रतिक्षा शिरसाठ हिने मानले. या हिमोग्लोबीन तपासणी शिबिराला विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *