संजीवनी पाॅलिटेक्निकमध्ये मुलींच्या राज्य स्तरीय स्पर्धा संपन्न
कोपरगांव प्रतिनिधी: शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात जेवढे आपण खेळात सहभागी असु, तेवढी आपली पुढील जीवनात प्रगती होते. कारण खेळच आपल्याला हार जीत पचविण्याची क्षमता, निर्णय क्षमता, शारीरिक क्षमता, इत्यादी आवश्यक बाबींची रूजवण करीत असतो. विशेषतः मुलींवर भविष्यात अनेक जबाबदाऱ्या पडतात, या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलण्यासाठी खेळातुन मिळणारे पैलुच आपल्याला उपयोगी पडतात, म्हणुन खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या व्यवस्थापकिय संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी केले.
आंतर पदविका अभियांत्रिकी विध्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजित व संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक आयोजित राज्यातील पाॅलिटेक्निक्स व फार्मसी संस्थांमधिल मुलींच्या राज्य स्तरीय व्हाॅलिबाॅल सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन डाॅ. कोल्हे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य ए. आर. मिरीकर, आयईडीएसएसएच्या प्रतिनिधी प्रा. पी. के. झाडे उपस्थित होते. राज्यातील सर्व खेळाडू व संघ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी सांगीतले की पुर्वी महाराष्ट्र राज्यात मुलींच्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी फक्त पाच विभाग होते. परंतु मुलींची पाॅलिटेक्निक आणि फार्मसी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची वाढती संख्या आणि त्यांची विविध क्रीडा प्रकारांमधिल जागरूकता वाढीमुळे आयईडीएसएसएआता सोळा विभाग केले असुन मुली खेळात भाग घेवुन आपले व्यक्तिमत्व खुलवित आहे, ही आनंदाची बाब आहे. संजीवनीच्या क्रीडा परंपरे बाबत बोलताना ते म्हणाले की येथे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे संजीवनीचे मुले मुली विविध स्पर्धांमध्ये जिंकतात.
डाॅ. कोल्हे पुढे म्हणाल्या की तंदुरूस्त शरीर आणि निरोगी मन हे खेळामुळे मिळते. मुलींनी अभ्यासाबरोबरच कोणत्यातरी खेळात निपुण व्हावे. जेव्हा आपण एखादी अपेक्षा पुर्ण न झाल्यास निराश होतो, तेव्हा खेळातुन प्राप्त झालेली खिलाडूवृत्तीच आपणास नैराशेतून बाहेर काढते.
या राज्यस्तरीय सामन्यांमध्ये गव्हर्नमेंट पाॅलिटेक्निक, तासगांव (सांगली) ने प्रथम क्रमांक मिळविला तर शरद इन्स्टिटयूट , याड्राव (कोल्हापुर) संघ उपविजेता ठरला. प्रा. आय.के सय्यद यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. माहिनी गुंजाळ यांनी आभार मानले.

फोटो ओळीः आयईडीएसएसए, महाराष्ट्र राज्य प्रायोजित व संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक आयोजित मुलींच्या राज्य स्तरीय व्हाॅलिबाॅल सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या डाॅ. मनाली कोल्हे यांच्या समवेत टिपलेले छायाचित्र.
