
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना ज्यांना विकास करता आला नाही. लाटेवर निवडून येवून ३० हजाराचे मताधिक्य ज्यांना टिकविता आले नाही त्यांनी आता काही पंचवार्षिक आराम करावा अशी बोचरी टीका पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
कोल्हेंनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चा दरम्यान माध्यमांशी बोलतांना आ. आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी मोजक्याच शब्दात बोचरी टीका दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे. प्रसिद्धी पत्रकात काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोणत्या ग्रामपंचायतींना किती निधी आला हे विरोधकांनी अगोदर तपासून पहावे. ग्रामपंचायतींना निधी देण्याचे काम जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जिल्हा परिषद करत असतांना अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे आंदोलन करण्याचा काहीच सबंध नाही. ज्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला त्याप्रमाणे त्या त्या वस्त्यांना निधी वितरीत करण्यात आला आहे. आ.आशुतोष काळे यांनी देखील वेळोवेळी विविध ग्रामपंचायतींना विविध योजनेच्या माध्यमातून निधी दिला असून त्या ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. मात्र ज्यांना विकास करता आला नाही व होत असलेला विकास पाहवत नाही ते बिनबुडाचे आरोप करून जनतेचे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
आ.आशुतोष काळे यांच्या रूपाने उच्च शिक्षित नेतृत्व मतदार संघाला लाभलेलं आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीतून मतदार संघाचे प्रलंबित प्रश्नांना विधानसभेत ते वाचा फोडत आहेत. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने त्यांचे पक्षात देखील वजन असून त्या राजकीय वजनाचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून मतदार संघासाठी सातत्याने निधी आणून रस्ते, पाणी, आरोग्य आदी मुलभूत विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. ज्यानी कोपरगाव शहराची तहान भागू नये यासाठी सत्तेचा गैरवापर करून ५ नंबर साठवण तलावाला विरोध केला तो विरोध मोडून काढत आ. आशुतोष काळे यांनी हा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. त्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्न त्यांना पडलेला असल्याचा टोला अर्जुनराव काळे यांनी लगावला आहे. ज्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना पक्षात देखील स्थान राहिलेले नाही हे त्यांनी त्यांच्या तोंडून कबुल केले आहे त्यामुळे त्यांनी आता काही पंचवार्षिक तरी आराम करावा कारण त्यांनी आता आराम करावा हि मतदार संघातील जनतेची इच्छा आहे असे अर्जुनराव काळे यांनी शेवटी म्हटले आहे.
