के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे इयत्ता बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. फेब्रुवारी २०२४ मध्ये बोर्ड प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी. बारे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून मा. संदिपराव रोहमारे, मा.सुजीतराव रोहमारे, के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मा. सुजीतराव रोहमारे यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा देतांना असे समारंभ हे तुमच्या आयुष्याला यशस्वी वळण देणारे असल्याचे म्हटले तसेच शिक्षणाचा मार्ग निवडून योग्य निर्णय घेऊन आपले आयुष्य यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालय करत असलेले शैक्षणिक कार्य निश्चितच गौरवास्पद आहे. या महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच वेगवेगळे कोर्सेस सुरू झालेले असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या रोजगार निर्मितीसाठी होईल. समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतात मा. संदिपराव रोहमारे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व नमूद करतांनाच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहातील नवनवीन बदल स्वीकारून परिश्रमाद्वारे आपले ध्येय प्राप्त करावे. यशस्वी होऊन आपला व समाजाचा नावलौकिक वाढवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चासनळी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी. बारे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास नमूद करतांना बोर्डाच्या वतीने संपन्न होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करतांना श्री. हर्षद गाडे यांनी सांगितले की, मा. अशोकराव रोहमारे साहेब यांनी चासनळी सारख्या ग्रामीण भागात महाविद्यालय सुरू करून मुलींच्या शिक्षणाची उत्तम सोय केली आहे. त्यांनी उभारलेल्या या शैक्षणिक संकुलात परिसरातील अनेक विद्यार्थिनी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी माळी व कु. पूनम बारगळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. पल्लवी वाकळे हिने मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *