
कोपरगाव प्रतिनिधी:-
महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतक-यांचे थकीत कर्ज दोन लाखाच्या वरील आहे त्या शेतक-यांना अदयापही कर्जमुक्तीचा लाभ झालेला नाही असे कोपरगाव तालुक्यात सुमारे 275 शेतकरी आहेत तर नियमीत कर्जाची परत फेड करणारे 16 हजार 577 शेतकरी असुन त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली असुन ही रक्कम तात्काळ शेतक-यांना मिळणेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक विवेकभैया कोल्हे यांनी अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संचालक विवेकभैया कोल्हे यांनी सोमवारी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके यांची भेट घेउन त्यांना निवेदन दिले, या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा बॅंकेअंतर्गत तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी 275 असुन त्यांना सुमारे 7 कोटी 61 लाख 96 हजार रूपये तर नियमीत कर्ज परतफेड करणारे 16 हजार 577 शेतकरी असुन त्यांना 108 कोटी 56 लाख रूपये मिळणार आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे. मागील हंगामात शेतक-यांना अतिवृष्टीचा फटका बसला त्यामुळे त्यांच्या हातुन खरीपाचे पिक वाया गेले तर रब्बी हंगामाची पीके उभी करतांना मोठी आर्थीक कसरत करावी लागली. त्यात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले आहे. रब्बी पीक काढणीला आले आहे त्याचाही खर्च मोठा आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्यास शेतक-यांना दिलासा मिळेल, त्याकरीता जिल्हा बॅंकेमार्फत पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी श्री कोल्हे यांनी केली.
