‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात कोपरगावकर पोट धरून हसलेतहसीलच्या विस्तीर्ण मैदानावर तुफानी हास्याचे उडाले फवारे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली असून याच कार्यक्रमातील कलाकारांनी कोपरगावकरांना देखील ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ या कार्यक्रमात पोट धरून हसायला लावले. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने सोमवार (दि.०३) रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मैदानावर ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या नियोजित वेळेनुसार रसिकांनी तहसील कार्यलयाच्या मैदानाची वाट धरून काही वेळात संपूर्ण मैदान गर्दीने फुलून गेले होते. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौगुले, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे/संबेराव, वनिता खरात, रोहित माने (सावत्या) यांचे उत्तम अभिनय, खुमासदार विनोद, नव्या पिढीचे सुप्रसिद्ध गायक अंजली गायकवाड, चैतन्य देवरे यांच्या सुरेल आवाजातील गाणी व त्या जोडीला सिनेस्टार, सुप्रसिद्ध नृत्यांगना, रील स्टार माधुरी पवार हिच्या बहारदार नृत्याने कोपरगावकरांची मने जिंकून घेतली. ठसकेबाज लावण्यांवर देखणा नृत्याविष्कार व विनोदाच्या हास्याचे फवारे आणि त्याला शिट्ट्या-टाळ्यांची भरभरून मिळालेली दाद अशा जल्लोषी वातावरणात ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ अलोट गर्दीत उत्साहात संपन्न होवून कोपरगावकरांनी विनोदाचा गारवा अनुभवला.
निसर्गाकडून हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान असून निरोगी राहण्यासाठी हसणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र ताणतणाव व धकाधकीच्या जीवनात माणूस आपले हसणेच विसरला आहे. त्यामुळे कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी देखील २०१८ मध्ये ‘झी’ मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध असलेल्या ‘चला हवा येवू द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांचा ‘चला हवा होवू द्या’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देखील प्रेक्षकांनी मोठी गर्दी करून गर्दीचा उंचांक केला होता त्याचीच पुनरावृत्ती ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमावेळी झाल्याचे दिसून आले व कोपरगावकरांना या निमित्ताने मनोरंजनाची आगळी वेगळी मेजवानी अनुभवता आली. कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर सी. सी. टी. व्ही. च्या निगराणीखाली ठेवण्यात आला होता. महिलांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी उपस्थित असणा-या सर्वच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सर्वच्या सर्व खुर्च्या पूर्णपणे भरल्यामुळे हजारो रसिकांनी उभे राहून तर काही रसिकांनी इमारतीच्या गच्चीवरून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
तत्पूर्वी पंचायत समिती प्रांगणातील कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. यशवंत माने, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ. निलेश लंके, आ. किरण लहामटे, लोकनेते बाबुराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील, मा.आ.भानुदास मुरकुटे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, संतोष माने, डॉ. सुगत चंद्रिकापुरे आदी मान्यवरांसह माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे आजी, माजी संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर झाडबुके, चैत्राली जाधव यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी आभार मानले.
चौकट :- कोपरगाव आणि पारनेरचे कौटुंबिक नाते आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी पारनेरमध्ये आमदार म्हणून काम केले. पारनेरचे रयत सेवक सांगतात आम्हाला काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेत मध्ये नोकरी दिली. त्यामुळे कोपरगाव बरोबरच पारनेर मध्ये देखील अनेक संसार साहेबांनी उभे केले आहेत. साहेब फक्त कोपरगावचे आधारस्तंभ नव्हते तर पारनेरचे देखील आधारस्तंभ होते. – आ. निलेश लंके
चौकट :- माझे दादाबाबा कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचे आदर्श विचार अंगीकारून वाटचाल करीत असतांना माजी आमदार अशोकराव काळे यांनी केलेली विकास कामे, त्यांची विकास कामांप्रती असलेली बांधिलकी, जनतेसाठी दिलेले योगदान व त्यांनी केलेल्या निस्वार्थी समाजसेवेचे फळ म्हणून मला कोपरगाव मतदार संघाच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिली. मतदार संघाची विकासाच्या बाबतीत झालेली वाताहत, कोपरगाव शहराला चेष्टेने धुळगाव संबोधले जाणे. त्यामुळे मी मनाशी निश्चय केला होता. मला कोपरगावच्या विकासासाठी लढायचं, कोपरगावचा विकास करायचा. मला कोपरगाव बदलायचं असून कोपरगावची ओळख बदलायची आहे. त्यादृष्टीने केलेल्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मागील तीन वर्षात १५०० कोटी व सरकार बदलल्यानंतर देखील ५५० कोटी असा जवळपास दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघासाठी आणला आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून लवकरच नागरिकांना नियमित पाणी मिळणार आहे. कालव्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न देखील सुटले आहेत. उर्वरित प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी आपली साथ यापुढे देखील अशीच ठेवा.- आ. आशुतोष काळे

फोटो ओळ – कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ऊपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे, सौ. पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळे, कारभारी आगवन, नारायण मांजरे.

फोटो ओळ – कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात रसिकांना आपल्या अभिनयातून मनसोक्त हसवीतांना कॉमेडी किंग समीर चौगुले, चेतना भट, रोहित माने, वनिता खरात व हजारोंच्या संख्यने उपस्थित असलेले रसिक.

फोटो ओळ:- कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात सिनेअभिनेत्री प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवारच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *