
कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये ‘बहि:शाल शिक्षण मंडळ’ अंतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली. व्याख्यानमालेसाठी संगमनेर येथील प्रसिध्द साहित्यिक श्री. अशोक आहेर हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते.
त्यांनी ‘श्रीकृष्ण नीती’ या विषयावर आपले विचार मांडताना सांगितले की, श्रीकृष्णाने अर्जुनाला पर्यायाने सर्वांना जीवन जगण्याचे तत्वज्ञान दिले . श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर यांच्या व्यक्तिमत्त्वात काय फरक आहे? ते सांगून श्रीकृष्णाचे गोपींत रमणारा, बाईलवेडा म्हणून बऱ्याच जणांकडून चुकीचे चरित्र चित्रण केले जाते. परंतु श्रीकृष्णाच्या कार्यावताराची बाळलीलांपासूनच चाहूल लागते,ती लक्षात घेणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाने अनेकांचा राज्याभिषेक करविला.परंतु स्वतः त्या लालसेने कधी वर्तन केले नाही.श्रीकृष्ण अनासक्त जगला. कारण श्रीकृष्ण हे युगांताची चाहूल लागताच पुण्यधर्म जागविण्यासाठी अवतरलेला नवा देवावतार होता. असेही श्री. आहेर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाचे कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर यांनी भूषविले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.रणधीर यांनी, ‘श्रीकृष्णाचे जीवनचरित्र आजच्या युगासाठी आदर्श असल्याचे सांगितले.’ श्रीकृष्णाप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिकांतून व्यवहार करावा लागतो. हा व्यवहार करताना तो निष्कामपणे करण्याचा संदेश श्रीकृष्णाचे चरित्र व गीता आपणाला देते.
या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.उज्ज्वला भोर,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बाबासाहेब शेंडगे, यांच्यासह डॉ.योगिता भिलोरे,प्रा.रावसाहेब दहे,प्रा.अक्षय आहेर यांसह कार्यालयीन अधीक्षक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधव यशवंत यांनी तर सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी मानले.
