
कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुक्यात जिल्हा बँकेसह विविध राष्ट्रीयकृत बँकाकडुन ७ हजार ४७७ शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची नियमित फेड केल्याबददल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे अनुदान जाहिर केले असुन त्यातील पहिल्या टप्यात १ हजार ३२३ शेतक-यांच्या खात्यावर या लाभाची रक्कम जमा झाली असून दुस-या टप्प्यात २ हजार ९५ शेतक-यांना हे अनुदान वितरण करण्याची कार्यवाही सुरू झाली असुन उर्वरीत ४ हजार ५९ शेतक-यांच्या अनुदान रक्कमेचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.
ते म्हणाले की, दुस-या टप्प्यातील २ हजार ९५ शेतक-यांनी ५० हजार रूपये अनुदान लाभ मिळण्यासाठी त्यांनी ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे त्याठिकाणी त्यांचे स्वतः आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. सदर अनुदान रक्कमेचा शेतक-यांना विविध कृषी कामासाठी उपयोग होणार असल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आदींचे विशेष आभार मानले आहे.
