
कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात शाखाविस्तार असलेली व अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद जळगाव, ठाणे आणि पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने याही वर्षी आपला आलेख चढता ठेवत मार्च 2022 अखेर आर्थिक क्षेत्रात भरघोस प्रगती केलेली आहे. बँकेचे विद्यमान चेअरमन श्री.सत्येन सुभाष मुंदडा यांनी नमूद केले की, संपूर्ण बँकिंग क्षेत्र हेच नव्हे तर जगभरातील सर्व आर्थिक संस्था या एका वेगळ्याच संक्रमणातून जात असून, कोविड-19 या महामारीने एकूणच स्थिती ही अधिक बिकट व कठीण करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर रशिया व युक्रेन या युद्धामुळे एकूणच संपूर्ण जग हे एका नवीन आर्थिक संक्रमणाच्या निर्णायक टप्प्यावर आलेले आहे, याचे दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असून, या सर्व अडचणीवर देखील आपल्या बँकेने यशस्वीरीत्या मात केलेली असून मार्च 2022 अखेर बँकेच्या एकूण ठेवी रु.268.19 कोटी तर कर्ज रु.147.10 कोटी इतके असून भाग भांडवल हे 6.19 कोटी इतके आहे, तर स्वनिधी हा रु. 37 कोटी 18 लक्ष इतका आहे, गुंतवणूक रु.149.43 कोटी व बँकेला ढोबळ नफा हा रु.3.80 कोटी इतका झालेला आहे, सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रु. 2 कोटी 34 लक्ष इतका आहे. नुकत्याच झालेल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढीचा बोजा पडूनसुद्धा बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे हे विशेष आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच बँक लवकरच मोबाइल बँकिंग सेवा सुरू करणार आहे. या आर्थिक प्रगती बरोबरच बँकेने आपले ढोबळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण हे 4.48 % इतके व थकबाकीचे प्रमाणे 4.28 % एवढे तर निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण 0 % इतके ठेवण्यात यश मिळवलेले असून हे सर्व निकष भारतीय रिझर्व बँकेच्या मापदंडानुसार चांगली स्थिती दर्शविणारे आहेत.
बँकेच्या या प्रगतीमध्ये सर्व सन्माननीय सभासद, ठेव खातेदार, कर्ज खातेदार यांनी बँकेला अतिशय चांगले सहकार्य करून आपल्या संस्थेचा नावलौकिक अधिक वाढविलेला आहे, हे बँकेच्या सुरक्षिततेच्या व विश्वासाच्या दृष्टीने फार मोठे व मोलाचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सेवक वर्गाने केलेल्या चांगल्या कामाची दखल व्यवस्थापनाने घेऊन सर्व कर्मचारी वर्गाला 2021-22 च्या वेतनाच्या 15 % बोनस व सानुग्रह अनुदान तसेच 15 दिवसांचे वेतन हे जादा कामाचा मोबदला म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. आतापर्यंत बँकेचे ठेवीदार, कर्जदार, खातेदार, सभासद व हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले, बँकेस सतत अ वर्ग प्राप्त असून यापुढेही संचालक मंडळ यशाची चढती कमान अशाच प्रकारे कायम ठेवेल, असा विश्वास बँकेचे चेअरमन सत्येन मुंदडा व व्हाईस चेअरमन सौ. प्रतिभा शिलेदार यांनी व्यक्त केले.
बँकेच्या या प्रगतीमध्ये बॅंकेचे ज्येष्ठ संचालक कै.रतनचंद ठोळे, कैलासचंद ठोळे, डॉ.विजयकुमार कोठारी, सुनील कंगले, रवींद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, राजेंद्र शिंगी, सुनील बंब, हेमंत बोरावके, अतुल काले, रविंद्र ठोळे, वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, एडव्होकेट संजय भोकरे व सेवक प्रतिनिधी श्री पापडीवाल, श्री.पैठणकर तसेच बँकेचे विधी सल्लागार एडव्होकेट एस डी कुलकर्णी एडव्होकेट पी बी पटणी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिपक एकबोटे, असिस्टंट जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड, अधिकारी विठ्ठल रोठे व बँकेचा सर्व सेवक वर्ग यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.
