
कोपरगांव प्रतिनिधी:-
गांधी फाउंडेशन जळगांव व स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षे मध्ये सोमैया महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त करून एक सुवर्णपदक व दोन रौप्य पदके प्राप्त केली आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
या प्रसंगी परीक्षा समन्वयक प्रो. डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, “उपरोक्त परीक्षेत सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्या १० वर्षांपासून भाग घेत आहेत. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे या परीक्षा विस्कळीत झाल्या होत्या. यंदा या परीक्षेत महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी कु. जानवी निकम (तृतीय वर्ष विज्ञान) हीने अहमदनगर जिल्ह्यात तृतीय वर्ष विभागात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक व प्रमाणपत्र, मुस्तफा शहा (तृतीय वर्ष कला) याने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक तर कु. दिव्या साबणे (प्रथम वर्ष कला) हीने प्रथम वर्ष विभागात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक व प्रमाणपत्र मिळविले आहे.”
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी व विश्वस्त मा. संदीप रोहमारे यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना मा. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव शुभहस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. विजय ठाणगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ. संजय दवंगे,प्रा. निलेश गायकवाड उपस्थित होते.
