शहरातील वाळू वाहतुक प्रश्नी नगराध्यक्षांनी बोलावलेली बैठक निष्फळ..!

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी : आधीच शहरातील रस्त्यांची असलेली वाईट परिस्थिती पाहता शहरातून होणारी वाळूची जडवाहतूक रोखावी याकरिता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बोलावलेली बैठक काहीही तोडगा न निघताच संपली . राज्याच्या महसूल विभागाने नव्याने केलेल्या वाळू साठा लिलावामध्ये कोपरगाव तालुक्यातील वाळू साठ्यांचाही समावेश आहे. या वाळूच्या जड वाहतुकीमुळे शहरातील रस्ते पूर्णपणे खराब होईल अशी भीती व्यक्त करून हि वाळू वाहतूक शहरातून होऊ नये यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नगरपरिषद येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांची बैठक बोलावली होती . याबैठकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे आपले मत व्यक्त करताना म्हणाले कि शहरातील रस्त्यांसाठी आधीच निधीची कमतरता असते . त्यातच आता झालेल्या वाळूच्या ठेक्यांच्या लिलावामुळे वाळूचे ओव्हरलोड वाहने भरधांवपणे सुरु होतील त्यामुळे शहरातील रास्त्यांची पूर्णपणे वाट लागणार आहे . त्याकरिता सर्व पक्षीयांनी व नागरिकांनीही या वाळूवाहतुकीला विरोध करावा .यावर अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी आपले मत मांडले .यातील काहींनी याबाजूने तर काहींनी याविरोधात मत प्रदर्शित केले. राष्ट्रवादीचे संदीप वर्पे म्हणाले कि वाळू वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात हे पूर्णपणे सत्य आहे . मात्र वाळूचे ठेके शासकीय आदेशाप्रमाणे निघाले असल्याने त्याला विरोध करणे चुकीचे ठरेल. त्याऐवजी रस्त्यांवर गतिरोधक बसवावे . वाळूच्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावे.
भाजपचे पराग संधान आपले मत व्यक्त करताना म्हणाले कि शहरातून होणारी वाळू वाहतूक हि मख्यत्वे इंदिरापथ – टाकळी रास्ता यामार्गाने होणार आहे .हा रास्ता शहराच्या उपनगरांना व ग्रामीण भागाला जोडणारा प्रमुख रास्ता आहे,या रस्त्यालाच अनेक रुग्णालय , शाळा आहेत त्यामुळे या रस्त्यावर नागरिक , विध्यार्थी, रुग्ण, यांची प्रचंड वर्दळ आहे . त्यातच हा रास्ता आधीच खराब व अरुंद आहे .कारण वाळू वाहतूक करणारे वाहन हे परवाना ३ टन असताना ४० टन वाहनात भारतात , शिवाय कोणतेही वाहतूक नियम न पाळता भरधाव वेगाने वाहने चालवतात . या रस्त्याने वाळू वाहतूक सुरु झाल्यास मोठ्या अपघातांची शक्यता आहे . यातून होणाऱ्या जीवित व वित्त हानीची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल उपस्थित त्यांनी केला . तर माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे म्हणाले कि शहराच्या विकासकामात तसेच शहराच्या मूलभूत प्रश्नांवर आमच्या नेत्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, त्यामुळे वाळूवाहतुकीचे दुष्परिणाम पाहता आमचा चांगल्या कामासाठी नगराध्यक्षाना पाठिंबाच आहे. परंतु वाळू ठेक्याचा निर्णय शासनाचा असल्याने त्यास विरोध करण्याऐवजी तालुक्याचे प्रतिनिधी आमदार , तहसीलदार , मुख्याधिकारी ,पोलीस निरीक्षक या सर्वानी मिळून वाळू वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढावा . तर दत्ता काले यांनी याबाबत सर्व पक्षीय कार्यकर्ते व जनतेचे प्रतिनिधी म्हुणुन नगराध्यक्ष वहाडणे यांनीच पुढाकार घेत आमदार आशुतोष काळे यांचे सोबत बैठक घ्यावी अशी सूचना मांडली. यावर नगराध्यक्ष यांनी आपण लवकरच या प्रश्नावर लोकप्रतिनिधी , व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याची त्यांना विनंती करू असे आश्वासन दिले. एकंदरीत फक्त चर्चा व प्रश्न मांडत कोणताही ठोस निर्णय न होताच हि बैठक संपली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *