शंकरराव कोल्हेंच्या निधनाने शेती समृध्दीसाठी झटणारा सिंह काळाच्या पडद्याआड:- देवेंद्र फडणवीस…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
शंकरराव कोल्हे हे ग्रामिण जनजीवनाशी आणि काळया मातीशी आयूष्यभर प्रामाणिक राहिले त्यांच्या निधनाने शेती समृध्दीसाठी झटणारा सिंह काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने व्यक्तीगत कोल्हे कुटूंबापेक्षा समाजाची मोठी हानी झाली आहे असेही ते म्हणाले.
श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे कुटूंबियांची सांत्वनपर शनिवारी भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंधुताई कोल्हे, नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमा वसंतराव पवार, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलींदराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, सुमितदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकदादा कोल्हे, प्रणव वसंतराव पवार, वेदांग मिलींद कोल्हे, ईशान कोल्हे, डॉ. प्राची वसंतराव पवार, अमृता वसंतराव पवार, सौ. मनाली कोल्हे, सौ. निकीता कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे यांच्यासह राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आण्णासाहेब म्हस्के आदि उपस्थित होते.
श्री. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येसगांवच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्द सुरू करत अविरत ७० वर्षे समाजकारण करून या भागात सहकाराच्या माध्यमांतुन साखर कारखानदारी, अभियांत्रीकी, तांत्रीक शिक्षणाबरोबरच आरोग्य, पाणी अडवा पाणी जिरवा, सिंचन, रोजगार स्वयंरोजगार, महिला बचतगट उन्नती, शेतक-यांची क्रयशक्ती आदि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. विधीमंडळात त्यांची नेहमीच सिंहगर्जना असायची. रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, नॅशनल फेडरेशन, नॅशनल हेवी इंजिनियरींग आदि संस्थांच्या उभारणी व जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. १९९९ मध्ये त्यांची व आपली व्यक्तीगत भेट झाली, त्यांचा वाचन व्यासंग अफाट होता. अष्टपैलु व्यक्तीमत्वातुन त्यांनी स्वतःबरोबर समाजाला घडविले. समाजकारण अर्थकारण, शेती सहकार, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय शेती करार, साखर आयात- निर्यात, परराष्ट्र धोरण, विकसित व विकसनशील देश व त्यातील शेती आदि विषयावर त्यांचा सखोल अभ्यास होता. समाजकारण, परिवर्तनाकरता राजकारण हा गुण त्यांच्याकडुन शिकायला मिळाला. आपल्या जलयुक्त शिवार योजनेचे त्यांनी कौतुक केले होते. त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. या दुःखातुन परमेश्वर कोल्हे कुटूंबियांना सावरण्याची शक्ती प्रदान करो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमचे सर्व सहकारी, भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे आहोत, शंकरराव कोल्हे यांची लढाउ वृत्ती प्रत्येकाने येथुन पुढच्या सामाजिक जीवनांत कायम ठेवावी हीच त्यांच्या कार्याला खरी श्रध्दांजली ठरेल असे ते शेवटी म्हणाले.

फोटोओळी:- कोपरगांव
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कोल्हे कुटूंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. त्यांच्या समवेत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आण्णासाहेब म्हस्के आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *