कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- देशविदेशातील साईभक्तांना शिर्डीला येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी १५० कोटी निधी दिला आहे. त्याबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.
देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या शिर्डी येथील श्री साईबाबांचे देश विदेशात असंख्य साईभक्त आहेत. या साईभक्तांना शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले. मात्र काकडी विमानतळ जरी आंतरराष्ट्रीय असले तरी नाईट लँडिगचा झालेला बट्ट्याबोळ व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे काही वर्षापासून हे विमानतळ समस्यांच्या चक्रव्युहात अडकले होते. त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तांना सोयी-सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे साई भक्तांमध्ये देखील नाराजी पसरल्यामुळे शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांची संख्या रोडावली होती. त्याचा परिणाम काकडी विमानतळावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांवर झाल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ना. आशुतोष काळे यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशविदेशातील साईभक्तांना काकडी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी आग्रही असणाऱ्या ना. आशुतोष काळे यांनी काकडी विमानतळासाठी निधी मिळावा यासाठी आपला पाठपुराव्याची धार अधिकच वाढविल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी काकडी विमानतळाला १५० कोटी निधी दिला आहे.त्यामुळे साईभक्तांना येणाऱ्या अडचणी तर दूर होणार आहे. शिर्डी विमानतळ हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. कार्गो सेवा सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीतून पूर्ण क्षमतेने कार्गो सेवा सुरु होवून राज्याच्या आर्थिक व्यवस्थेस कार्गो सेवेतून हातभार लागनार असून एकाच वेळी शेतकरी व शासनाचे हित साधले जाणार आहे. त्याचबरोबर मागील दोन वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे काकडी आणि परिसराला आलेली आर्थिक मरगळ देखील कायमस्वरूपी दूर होणार आहे. त्यामुळे १५० कोटी निधीचे विशेष महत्व असून या निधीतून अनेक हेतू साध्य होणार असल्यामुळे अधिवेशनाचा दिवसभराचा कार्यकाळ आटोपल्यानंतर ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांची भेट घेवून त्यांचे मत्तदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले.

फोटो ओळ:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानतांना ना. आशुतोष काळे समवेत आ. रोहित पवार.
