
लोककला पथकांच्या माध्यमातून जनजागृती…
कोपरगाव प्रतिनीधी
(शिर्डी):-
शासनाने दोन वर्षात केलेली जनसेवेची कामे लोक कलापथकांच्या माध्यमातून खेड्या-पाड्यांत, वाड्या-वस्त्यांवर पोहोचविणाऱ्या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी संगमनेर तालुक्यातील समनापूर व कोपरगांव तालुक्यातील निमगाव व रूई या गावांमध्ये शाहिरी आवाज दुमदुमला.


कला साध्य प्रतिष्ठानचे शाहीर संदीप जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसंगीत, भारूडे, पोवाडा, शाहिरी या पारंपरिक माध्यमांचा वापर करत कार्यक्रम सादर केला.

संगमनेर मधील समनापूर आठवडे बाजार व कोपरगांव रस्त्यावरील निमगांव आणि रुई येथील मुख्य चौकात झालेल्या कलापथक कार्यक्रमास आबालवृद्धांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समनापूर येथील कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, पोलीस उपनिरीक्षक श्री.जाणे आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ता कासार यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनाच्या शिवभोजन थाळी, स्वच्छ भारत अभियान, महाआवास, आदिवासी खावटी अनुदान योजना यासह विविध योजनांची कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. महिला व बालविकास विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. त्याप्रमाणे ग्रामविकास, कृषी,पणन, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, आदिवासी विकास, रोजगार हमी, आरोग्य या सारख्या अनेक विभागांनी या दोन वर्षाच्या काळात जनकल्याणासाठी योजना तयार केल्या व अंमलबजावणी केली. या योजनांची माहिती नागरिकांना व लाभार्थ्यांना व्हावी आणि त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा घ्यावा, यासाठी कलपथकांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचविली जात आहे. ही मोहीम ९ ते १७ मार्च दरम्यान राबविण्यात येत आहे.

आपल्या गावात कलापथक मंडळ आल्यास या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात येत आहे.
