
कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जेष्ट स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदेवराव गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. याकरिता त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कॉम्रेड नामदेवराव हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहिले.
स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव गोडसे यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने गोडसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय गोडसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.
