
कोपरगांव प्रतिनिधी:-
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात, मात्र त्याची सोडवणूक करून प्रकाशाचा मार्ग दाखविणारे गुरुच असतात, त्यामुळे त्यांच्याविषयीची अध्यात्मीक शिकवण, संस्कार देण्यांचे काम दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्रातून दिले जाते आणि प.पू आण्णासाहेब मोरे दादा हे देखील गुरुमहती साठी सतत कष्ट घेऊन उल्लेखनीय कार्य करतात असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. गुरूंची सफलता मिळाल्याने संस्था आणि व्यक्ती घडत असतात असेही ते म्हणाले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर १४ वर्षापासुन गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन होत असून त्याची सांगता बिपीनदादा कोल्हे यांचे हस्ते रविवारी झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. ७५ पारायणार्थीचा श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तज्ञ संचालक विवेक कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, संजीवनी उद्योग समुहाच्या विविध संस्थांचे आजी माजी संचालक, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, स्वामी समर्थ केंद्र कोपरगावसह विविध केंद्राचे मार्गदर्शक, महिला भगिनी, कामगार आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, आई आणि गुरु या दोन व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत मौलवान असतात, एक आपल्याला घडवते तर गुरु जीवनातील अडचणींचा अंधकार प्रकाशमान करण्यांचे काम करतात. गुरूंची महती गुरुचरित्र दत्त सेवेत सर्वांना समजते. तेव्हा प्रत्येकाने कितीही अडचणी आल्या तरी गुरुसेवा खंडीत करू नये असेही ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. चंद्रकांत जाधव यांनी सूत्रसंचलन केले.


फोटोओळी:-
कोपरगांव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावरील गुरुचरित्र पारायणाची सांगता अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली.
