

कोपरगाव प्रतिनिधी:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ तनपुरे साखर कारखाना हद्दीतील अंबिकानगर जवळ असलेल्या स्मशानभूमीचे आज स्थानिक तरुणांनी पुष्प अर्पण करून लोकार्पण केले.
दि. ११ जानेवारी २०२१ रोजी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी या स्मशानभूमीची व्यथा त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह मांडली होती. त्यामध्ये धनंजय डोंगरे, विकास सातपुते सोमनाथ डुकरे यांचेसह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्या लाईव्ह मध्ये माणसाला शेवटचा क्षण तरी विसाव्याचा जावा हा उल्लेख करून त्या स्मशानभूमीचे वास्तव ढुस यांनी मांडले होते. आजही तो फेसबुक लाईव्ह नागरिकांना पाहणेसाठी उपलब्ध आहे.
तदनंतर दि. २० जानेवारी २१ रोजी अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब यांनी देवळाली प्रवरा नागतपालिकेला भेट देऊन माणसाला शेवटचा क्षण तरी विसाव्याचा जावा असे सांगून या स्मशानभूमीचा तात्काळ प्रस्ताव देणेस सांगितले होते.
सदर स्मशानभूमी ही डॉ तनपुरे साखर कारखाना हद्दीत असल्याने येथील प्रशांत काळे व अंबिका मित्रमंडळ आणि स्थानिक नागरिकानी दि. २० सप्टेंबर २०१८ रोजी कारखान्याचे या स्मशानभूमीसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.
ही स्मशानभूमी व्हावी म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी कित्येक वेळेस आंदोलने केली होती. परंतु कारखान्याचे संचालकपद आणि दोनदा आमदारकीची संधी देवळालीला मिळूनही ही स्मशानभूमी झाली नाही.
शेवटी स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाला यश आल्याने ही स्मशानभूमी झाली असल्याने कोणीही श्रेय घेणेसाठी धडपड करू नये म्हणून आज स्थानिक नागरिकांनी पुष्प अर्पण करून त्या स्मशानभूमीचे लोकार्पण केले.
