
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा,कांदा,मका आदी पिके जोमात आहे. काही भागात तर गहू, कांदे, हरभरा या पिकांना केवळ शेवटच्या पाण्याची आवश्यकता असून लाभ क्षेत्रातील सर्व ऊस पिकांच्या तोडी झाल्यामुळे खोडव्यांच्या मशागती सुरू असून त्यांना देखील सिंचनासाठी पाणी लागणार आहे. त्यामुळे रब्बी पिकांबरोबरच चारा पिकांना, खोडव्यांना व फळबागांना देखील सिंचनासाठी पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी कालव्यांना तातडीने सिंचनासाठी आवर्तन सोडा असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची आवश्यकता भासणार आहे. अशा परिस्थितीत अतिशय जोमात असलेल्या रब्बी पिकांना पाण्याची टंचाई जाणवू नये व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गोदावरी कालव्याच्या लाभ धारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी वेळेत आवर्तन सोडणे अत्यंत गरजेचे आहे.
मागील वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे धरण क्षेत्रातही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे त्याचा लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत फायदा व्हावा यासाठी आवर्तन सोडल्यास शेतकऱ्यांच्या चिंता दूर होणार असून नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही. यासाठी पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडावे असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
