गोदावरी कालव्यांना उन्हाळ हंगामाचे आणखी एक पाणी आर्वतन तात्काळ सोडावे – बिपीनदादा कोल्हे यांची नाशिक पाटबंधारे विभागाकडे मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या दारणा व गंगापूर धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामासाठी आणखी एक पाण्याचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे, अशी ठाम मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
बिपीनदादा कोल्हे यांनी यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, उन्हाळ हंगाम १ मार्च ते ३० जून या कालावधीत असतो. या कालावधीसाठी गोदावरी उजवा व डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नमुना क्रमांक ७ वर आधारित पाण्याची मागणी केलेली असून ती अधिकृतरीत्या मंजूर देखील झाली आहे.
सध्या कोपरगाव आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बारमाही ऊस लागवड केलेली असून या पिकास वेळेवर आणि सातत्याने पाण्याचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. सध्या गोदावरी कालव्यामार्गे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू करण्यात आले आहे, मात्र शेतीसाठी आवश्यक असलेले आवर्तन अद्याप देण्यात आलेले नाही.
बिपीनदादा कोल्हे यांनी स्पष्ट केले की, धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असताना देखील शेतकऱ्यांना पाण्याविना त्यांच्या पिकांचे नुकसान सहन करावे लागणे ही शासन यंत्रणेची मोठी तांत्रिक चूक ठरेल. त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामासाठी शेतीसाठीचे आणखी एक आवर्तन तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सोडण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *