महात्मा फुले कृषी विद्यापीठात 65 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा…

Uncategorized

राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान:- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…
कोपरगाव प्रतिनिधी:-
(राहुरी विद्यापीठ):-
विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकर्यांना उपयोगी ठरणार्या 1866 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 311 वाणांची निर्मिती व 51 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. आपल्या विद्यापीठाच्या 38 व्या पदवीप्रदान समारंभात विद्यापीठाने एकूण 5,201 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या आहेत. राहुरी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या प्रमुख 8 पीकांच्या वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकुण रु. 2,40,188 कोटी व निव्वळ 32,206 कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. राज्याच्या तसेच देशाच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात 65 वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके व कृषी तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते. विद्यापीठात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे व एनसीसी अधिकारी डॉ. सुनील फुलसावंगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *