कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या २६ किलोमीटरच्या उपरस्त्यांसाठी (सर्व्हिस रोड) ५२ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे खराब झालेल्या उप रस्त्यांचा (सर्व्हिस रोड) प्रश्न मार्गी लागला असून कोपरगाव तालुक्यातील जवळपास २६ किलोमीटर रस्त्यांसाठी महायुती शासनाने तब्बल ५२ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
नागपूर-ते मुंबई या प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी बहुचर्चित समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून गेला असून या समृद्धी महामार्गाचे मागील वर्षी लोकार्पण होवून हा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर, कोकमठाण, धोत्रे, भोजडे, खोपडी, लौकी, कान्हेगाव, जेऊर कुंभारी, डाऊच, घारी, देर्डे, पोहेगाव आदी गावातील ज्या रस्त्यांचा वापर करण्यात आला. त्यापैकी अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळण अवलंबून असलेल्या हे रस्ते खराब झाल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, वाहनधारकांबरोबरच त्या त्या गावच्या परिसरातील नागरिकांना अनंत अडचणी येत होत्या. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी या गावातील नागरिकांची मागणी होती त्याबाबत नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे मागणी केली होती.
खराब उपरस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची आ. आशुतोष काळे यांनी दखल घेवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे प्रमुख अधिकारी, समृद्धी महामार्ग ठेकेदार व कार्यकर्त्यां समवेत रस्त्यांबाबत संवत्सर, कोकमठाण, धोत्रे, भोजडे, खोपडी, लौकी, कान्हेगाव, जेऊर कुंभारी, डाऊच, घारी, देर्डे, पोहेगाव आदी गावातील रस्त्यांची समक्ष पाहणी केली होती. नागरिकांना येत असलेल्या अडचणी लक्षात आणून देत या अडचणी सोडवून हे सर्व रस्ते पूर्ववत करून देण्याच्या त्यांनी सूचना केल्या होत्या. त्यावेळी बहुतांश रस्त्यांची दुरुस्ती झाली होती मात्र ज्या रस्त्यांची दुरुस्ती अद्याप बाकी होती त्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी निधी मिळावा याबाबत त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून पत्रव्यवहार देखील केले होते.
आ. आशुतोष काळे यांच्या त्या पाठपुराव्याची दखल अखेर महायुती शासनाने घेतली असून एम.एस.आर.डी.सी. कडून या एकूण २६ किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असून त्यामुळे संवत्सर, कोकमठाण, धोत्रे, भोजडे, खोपडी, लौकी, कान्हेगाव, जेऊर कुंभारी, डाऊच, घारी, देर्डे, पोहेगाव आदी गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून समृद्धी महामार्गामुळे खराब झालेल्या उपरस्त्यांचा (सर्व्हिस रोड) प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. उपरस्त्यांसाठी (सर्व्हिस रोड) ५२ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) ना.दादाजी भुसे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *