
कोपरगाव प्रतिनिधी:-
नाटय रसिकांच्या आग्रहाखातर कोपरगावकरांसाठी आधुनिक बंदिस्त नाटयगृह व्हावे म्हणून राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून बंदिस्त नाटयगृहासाठी निधी व जागा मिळावी म्हणून मागणी केली होती. त्यानुसार नाटयगृहासाठी 2 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला तसेच पाटबंधारे विभागाची सुमारे एक एकर जागाही दिली. परंतु मतदार संघाचा विकास करीत असल्याच्या फक्त वल्गना करणा-या विदयमान आमदारांनी हा नाटयगृृहाचा निधी दुसरीकडे वळवून कोपरगावकरांना नाटयगृहापासून वंचित ठेवण्याचे काम केले असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली.
बंदिस्त नाटयगृहासाठी निधी मिळवून देउन जागाही उपलब्ध करून दिली, सदरची प्रक्रिया पूर्ण झाली असतांना केवळ राजकीय स्वार्थापोटी सदरचा निधी अन्यत्र वळविण्याचे काम झाले आहे. जागेचा ताबा घेउन नाटयगृहाचे काम सुरू करण्याऐवजी विदयमान लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकांरी यांनी संगनमत करून बिले काढण्यासाठीच सदरचा निधी दुसरीकडे वळविला/पळविला आहे. ही कोपरगावकरांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे.
अहमदनगर जिल्हयातील मोठी नगरपरिषद असलेल्या कोपरगाव शहरातील कलात्मक व सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी आधुनिक नाटयगृह उभारणीच्या दृष्टीने सुमारे 8 कोटी रूपयाचा निधी मिळावा म्हणून दि. 20 मार्च 2015 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे मागणी केली होती, त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक नपावै-2017/प्र.क्र.172/98/नवि-16. दि.20 नोहेंबर 2017 अन्वये सन 2017-18 करीता 2 कोटी रूपयाचा निधी कोपरगाव नगरपरिषदेला वितरीत करण्यात आला. तसेच इरिगेशन बंगल्या जवळील पाटबंधारे विभागाची जागाही या नाटयगृहासाठी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार कोपरगाव शहरात आधुनिक नाटयगृहास जलसंपदा विभागाच्या मालकीची स.नं.1935 व 1939 मधील जागेपैकी एक एकर जागा महामंडळाच्या नियामक मंडळाच्या विपय क्र.65/2,ठराव क्र.65/18 अन्वये नाटयगृह बांधण्याकरीता हस्तांतरीत करणे व करारनामा करून घेणेबाबत उपविभागीय अभियंता,गोदावरी डावा तट कालवा, उपविभाग, कोपरगाव यांनी कोपरगाव नगरपरिषदेस कळविले होते. वास्तविक अथक परिश्रम करून आपण बंदिस्त नाटयगृहासाठी निधी मंजुर करून आणला, तसेच जागाही उपलब्ध करून दिली, फक्त जागा ताब्यात घेउन काम सुरू करणे बाकी असतांना सदरचा निधी अन्यत्र वळवून बिले काढण्यासाठीचाच विरोधकांनी हा खटाटोप केला असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या. परंतु राजकीय द्वेषापोटी श्रेय मिळू नये म्हणून हे काम प्रलंबित ठेवून त्यासाठीचा मंजूर असलेला निधी वळविण्याचे/ पळविण्याचे काम करून कोपरगावच्या नाटयरसिकांचा भ्रमनिरास केला असल्याची खंतही सौ.कोल्हे यांनी व्यक्त केली.
