
(शेती हे व्यावहारिक शिक्षण देणारे विद्यापीठ)
कोपरगाव प्रतिनिधी:- “शेती ही खूप महत्त्वाची असून ती व्यावहारिक शिक्षण देणारे विद्यापीठ आहे. म्हणूनच कर्मवीरांनी अशा विद्यापीठाचे स्वप्न पाहिले.त्यांनी स्वावलंबन, श्रमनिष्ठा, स्वाभिमान, अशी मूल्ये रुजवितांना ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू करून समाजाला नवी तत्वे दिली. स्किल एज्युकेशन म्हणजेच कौशल्ययुक्त शिक्षणाचा पाया घातला. यामुळेच कर्मवीरांच्या रयतला राजा सयाजीरावांसारख्या थोरांचा आधार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्यांची मदत मिळाली. सेल्फी काढणं सोपं पण स्वतःची इमेज घडविणं महाकठीण असतं. विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या रयत मधून शिक्षण घेऊन अशी इमेज तयार करावी. त्यासाठी डॉ. आंबेडकरांप्रमाणे ज्ञानपीपासू विद्यार्थी व्हावं. मिळालेल्या उत्तरावर परत प्रश्न विचारण्याचं धाडस निर्माण करावं. असं होऊन सी. व्ही. रामन यांच्यानंतर, भारतात राहून नोबेल मिळवणारा विद्यार्थी ज्या दिवशी घडेल त्या दिवशी कर्मवीरांच्या शिक्षणरुपी वटवृक्षाला सुवर्णफळ लागेल” असे विचार प्रमुख पाहुणे म्हणून उदबोधित करताना ‘जडण-घडण’ या सुप्रसिद्ध मासिकाचे मुख्य संपादक आणि प्रथितयश लेखक डॉ.सागर देशपांडे यांनी व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव, पद्मा मेहता प्राथ. कन्या विद्यामंदिर डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव,या पाच शाखांच्या वतीने नुकताच १३५वा कर्मवीर जयंती सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सागर देशपांडे बोलत होते .
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. अॅड.भगीरथ शिंदे यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले, “कोणतीही संस्था केवळ विद्यार्थी संख्येवरून मोठी ठरत नाही तर मूल्यजतन व जोपासणा यावरून ती मोठी ठरत असते. 105 वर्षे होऊनही पद्मभूषण कर्मवीर अण्णा व वहिनींनी ठरविलेल्या मूल्यांशी तडजोड रयत शिक्षण संस्थेने केलेली नाही. त्यामुळेच इतर शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत असतानाही रयतच्या शाळा त्याला अपवाद ठरत आहेत गुणवत्तेवर प्रवेश दिला जाणाऱ्या या शाळांच्या भरभराटीत सेवक, सहकारी व विनामूल्य सेवा देणारे पदाधिकारी या सर्वांचे योगदान मोलाचे आहे”.
सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष मा.आमदार आशुतोषदादा काळे, माजी आमदार मा. अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माननीय बिपिनदादा कोल्हे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य सौ. चैताली ताई काळे व श्री विवेकदादा कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य मा.श्री पद्माकांत कुदळे, मा.श्री कारभारी आगवन, मा.श्री. मच्छिंद्र रोहमारे, मा.श्री. बाळासाहेब कदम,मा.श्री. संदीप वर्पे , मा.श्री. अरुण चंद्रे, महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा.श्री. सुनील गंगुले,यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि पाचही शाखांचे शाखाप्रमुख प्राचार्य मा.डॉ.रमेश सानप, मा.श्री.सुरेश कातकडे, मा.सौ. मंजुषा सुरवसे, मा. श्री. सुभाष दरेकर,मा.श्री नंदकुमार खाडे महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, प्रा. अरुण देशमुख, डॉ. अरविंद भागवत तसेच प्रा. रामभाऊ गमे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले. व पाहुण्यांचा परिचय डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक सुरेश कातकडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.छाया शिंदे व सौ.डॉ.वैशाली सुपेकर यांनी केले. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
