राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे:- एस.एम.देशमुख यांची सरकारकडे मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(वडवणी):-
राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे आणि त्यासाठी जागा आणि निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी केली..
बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी देशमुख बोलत होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शेषराव जगताप होते..
एस.एम देशमुख पुढे म्हणाले, शासन जिल्हा स्तरावर पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी देते मात्र तालुका स्तरावरील पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने आपल्या धोरणात बदल करीत प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी दिला पाहिजे.. त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.. वडवणी नगर पालिकेने मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे केले आहे तेथील एखादा गाळा नगरपालिकेने पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना देखील देशमुख यांनी यावेळी नगराध्यक्ष जगताप यांच्याकडे केली..
बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा आहे, मागास जिल्हा आहे ही बीडची ओळख पुसून काढण्यासाठी येथील सकारात्मक बातम्या मुंबई, पुण्याच्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या पाहिजेत,बीड जिल्हा आता कात टाकतोय, बीड जिल्ह्यात नवे ९ महामार्ग होत आहेत, रेल्वे येत आहे,शेती क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत नवे प्रयोग केले जात आहेत, विकासाचे नवे प्रकल्प राबविले जात आहेत, बीड जिल्हा आता बदलतो आहे.. या बातम्या प्राधान्याने मुंबई, पुण्यातील वर्तमानपत्रात आल्या तर जिल्ह्यात नवे उद्योग बीड जिल्ह्यात येतील आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल त्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असा सल्ला देशमुख यांनी पत्रकारांना दिला..
प्रारंभी स्थानिक शाखेचे अध्यक्ष विनायक जाधव यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे यांनी आभार मानले..
कार्यक्रमांस शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *