विकास पाहण्याची दृष्टी नसलेल्यांनी डोळ्यांच्या शिबीरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत:- सुनील गंगुले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- २०१४ ते २०१९ या पाच वर्षात केंद्रात व राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील जिरवा जिरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते देखील आभासी जगात वावरत होते. मात्र त्यांना या आभासी जगातून बाहेर काढण्याचे काम कोपरगाव मतदार संघातील जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत करून ना. आशुतोष काळे यांच्या हातात मोठ्या विश्वासाने विकासाची सूत्र सोपविली. त्या विश्वासाला कुठेही तडा जावू न देता अडीच वर्षातच ना. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या बहुतांश आश्वासनांची पूर्तता केली असून अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. यामध्ये कोपरगावच्या नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला ५ नं. साठवण तलावाचा देखील समावेश असून १३१.२४ कोटी निधीतून या तलावाचे काम सुरु झाले आहे. मात्र ज्यांच्याकडे विकास पहायची दृष्टी नाही ते बेताल आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. अशा विकास पाहण्याची दृष्टी नसलेल्यांनी डोळ्याच्या शिबिरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत असा टीकात्मक सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांना दिला आहे.
सुनील गंगूले यांनी असे म्हटले आहे की, गल्ली ते दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाची सत्ता असतांना देखील विरोधकांना जे जमले नाही ते ना. आशुतोष काळे यांनी फक्त राज्यात सत्ता असतांना करून दाखविले ते देखील अडीच वर्षात. जवळपास १००० कोटीच्या वर निधी मतदार संघासाठी आणून मतदार संघाचा कायापालट करून दाखविला. यामध्ये जटील झालेला कोपरगावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या ५ नं. साठवण तलावाचा समावेश आहे. ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीतून सुरु झालेले काम फक्त विरोधकांनाच दिसत नाही त्यामुळे त्यांना त्यांचे डोळे तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोपरगावचा पाणी प्रश्न सुटू नये अशी मानसिकता असलेल्या भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नावे ५ नं. साठवण तलाव होवू नये यासाठी न्यायालयात खोटी याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने दत्ता काले यांना तंबी देवून याचिका मागे घेण्यास सांगितले होते. तेच लोकप्रतिनिधींमुळे पाणी प्रश्न भिजत पडला असे म्हणतात, त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते.
कोपरगाव शहारतील लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहराला पाणी साठा मंजूर आहे मात्र वितरण व्यवस्था जुनी झाली असल्यामुळे वितरण करण्यात अडचणी येत आहेत याशिवाय शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून कोपरगाव शहरासाठी अतिरिक्त ३.३२ द.ल.घ.मी. पाणी ना.आशुतोष काळे यांनी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे शहरवासियांना माहित आहे ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यांनतर नियमित मुबलक पाणी मिळणार आहे. मात्र विरोधकांना आपली राजकीय पोळी शेकवायची असल्यामुळे ते नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे गंगुले यांनी म्हटले आहे.
मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहराला गोदावरी कालव्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत होणारा पाणी पुरवठा शुद्धच होता व भविष्यात देखील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिक समाधानी आहेत मात्र विरोधक धास्तावले आहेत.२८ विकास कामांना विरोध करणारे, कोपरगावच्या पाण्याला विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे कोण हे जनतेने ओळखले आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे वर्षानुवर्षापासून मिळणाऱ्या पाण्याला दुषित पाणी म्हणून उगाचच संभ्रम निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडून सुरु आहे. मतदार संघासह कोपरगाव शहरात झालेला विकासात्मक बदल विरोधकांना दिसत नाही. त्यामुळे त्यांनी डोळ्याच्या शिबिरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत व डोळे व्यवस्थित झाल्यावर ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु झाले का नाही ते स्वत:च्या डोळ्यांनी जावून पहावे असा सल्ला सुनील गंगुले यांनी दत्ता काले यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *