वक्तृत्व स्पर्धेतून उत्तम वक्ते घडतील:- उपाध्यक्ष सुधाकर रोहोम…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु सभा-समारंभात एखाद्या विषयावर किंवा एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट मांडणे सोपे नसते. त्यासाठी चिंतन आणि अभ्यासाची नितांत आवश्यकता असते. भविष्यात यशस्वी वक्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयात होणाऱ्या वक्तुत्व स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे. स्पर्धेत यश-अपयशाबरोबरच मिळालेले बक्षीस लहान किंवा मोठे याचा विचार करू नका. वक्तृत्व स्पर्धा विचार मांडण्याचे व महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कलेला उत्तेजन देणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होईल व या वक्तृत्व स्पर्धेतून भविष्यातील उत्तम वक्ते घडतील असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरात सौ. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तुत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, सदस्य डॉ. आय. के. सय्यद, मढी ग्रा. सदस्य आबा आभाळे, मढी खु. च्या माजी सरपंच सौ. वैशाली आभाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपसभापती अर्जुनराव काळे यांनी सौ. सुशीलामाई काळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याला उजाळा देतांना सांगितले की, एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे सौ. सुशीलामाई यांनी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना अत्यंत मोलाची साथ दिल्यामुळे कर्मवीर शंकररावजी काळे यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करू शकले. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांकडे मुलींसाठी शाळा-महाविद्यालय सुरु करण्यासाठी केलेल्या अट्टाहासामुळे हजारो मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे सांगितले.
यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य कल्याणराव सोनवणे, उपप्राचार्य सुरेश कातकडे, पर्यवेक्षक तुपे, संवत्सर विद्यालयाचे प्राचार्य जनार्दन खरात, कोतुळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य कानिफनाथ रहाटळ, पर्यवेक्षक उत्तमराव पाळंदे. उपप्राचार्य मधुकर गोडे सर पर्यवेक्षक रमेश मोरे, ज्युनियर विभाग प्रमुख अंगद काकडे,माजी शिक्षक पांडुरंग दिघे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी म्हस्के यांनी केले तर आभार रविंद्रनाथ मेढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ:- स्व. सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलतांना कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *