Uncategorized

गोदावरी पुलाचा भराव खचल्याची माहिती मिळताच आ.विवेकभैय्या कोल्हे यांचे अधिवेशनातुन पुलाच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश…

तातडीने कार्यवाही झाली मात्र निकृष्ट कामांची चौकशी करून कारवाईचे निर्देश :- आ. विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी वरील गोदावरी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजूचा भराव खचल्याची माहिती आमदार विवेकभैय्या कोल्हे यांना मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेत अधिवेशनस्थळावरूनच संबंधित अधिकाऱ्यांना खचलेल्या भरावाची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तसेच पुलाच्या भरावाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी आणि सदर रस्त्यावरील सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा तातडीच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना दिल्या.आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या सूचनेनुसार गुरुवार (दि.२) रोजी संबंधित यंत्रणेने खचलेल्या भरावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले.
कोपरगावच्या गोदावरी नदीवरील पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत माहिती मिळताच आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) सचिव तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून खचलेल्या भरावाची तातडीने दुरुस्ती, निकृष्ट कामांची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी पत्राद्वारे नमूद केले की, कोपरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी वरील गोदावरी नदीवर नुकताच नवीन मोठा पूल बांधून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, सुरू असलेल्या पावसामुळे पुलाच्या भरावाचा मोठा भाग खचून पाण्याबरोबर वाहून गेला असून पुलालगत मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून अपघात व जीवितहानी होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच या पुलाच्या कामासाठी शासनाने निश्चित केलेली मुदत संपूनही संबंधित कंत्राटदाराकडून वारंवार मुदतवाढ घेण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय महामार्गावरील मोहनीराजनगर बेट नाका आणि पुणतांबा चौफुली येथील भरावाचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या कामांचीही सखोल चौकशी करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पुलाची तात्काळ पाहणी करून खचलेल्या भरावाची युद्धपातळीवर दुरुस्ती केली.तसेच मोहनीराजनगर बेट नाका व पुणतांबा चौफुली येथील सुरू असलेल्या भरावाच्या कामांची स्वतंत्र व सखोल चौकशी करून कामाच्या गुणवत्तेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कंत्राटदार व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,असे निर्देशही आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *