Uncategorized

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य ही माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-दिव्यांगांना मदत करणे हे माझे समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे. प्रत्येक दिव्यांगाने कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगावे या उद्देशातून आजवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून जवळपास ८०० हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.त्यामुळे त्या दिव्यांग बांधवांच्या वेदना तर दूर झाल्याच आहेत परंतु त्यांना जीवन जगतांना येणाऱ्या अडचणी देखील बहुतांश प्रमाणात संपूष्टात येवून त्यांच्या स्वालंबनाला नवीन बळ मिळाले हि माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. दिव्यांग बांधवांना दयेची नव्हे, तर सन्मानाची गरज असून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य ही माझ्यासाठी खरी देवपूजा, ध्यान आणि जप असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई (जयपूर) व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गुरुवार दि.२५ रोजी दिव्यांग बंधू भगिनींची तपासणी करून दिव्यांगांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयवांचे अचूक मोजमाप घेऊन शुक्रवार (दि.२६) रोजी कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्याचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात १९७ दिव्यांग बांधवांना वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले कि, दिव्यांग बंधू भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी सिव्हील हॉस्पिटल अहिल्यानगर येथे जाण्या-येण्याच्या अनेक अडचणी येत असल्याने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मोफत वाहन सुविधा गेल्या सात वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. या सुविधेच्या माध्यमातून आजपर्यंत दोन हजारहून अधिक दिव्यांग बंधू भगिनींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली. या संधीच्या माध्यमातून जनसेवा करीत आहे. दिव्यांग बांधवांच्या अडचणी व त्यांचे परावलंबी जीवन स्वावलंबी कसे करता येईल यासाठी माझा खटाटोप सुरु असून मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे आणि यापुढेही करीत राहणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, श्री भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पदाधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :- शारीरिक व्यंगामुळे परावलंबी आयुष्य जगण्याची वेळ कोणावरही येऊ नये. प्रत्येक दिव्यांग बांधवाने स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने आणि ताठ मानेने स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्य जगावे ही माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यांच्या आयुष्यातील वेदना, अडचणी आणि असहाय्यता शक्य तितकी कमी करणे ही केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर समाजातील एक संवेदनशील माणूस म्हणून माझी सामाजिक बांधिलकी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा उमटणारे समाधानाचे हास्य, डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आणि स्वावलंबी आयुष्याची नवी उमेद हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे.-आमदार आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *