
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर-भाषेचा प्रसार करणे, नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपली जावून नव्या पिढीमध्ये कवितेविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशातून १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मराठी महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीच्या वतीने शनिवार (दि.०२) रोजी सायंकाळी ०६ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने बहारदार भव्य काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कविता ही भावना, विचार आणि मानवी अनुभव लयबद्ध व रसबद्ध शब्दांत मांडण्याचे प्रभावी माध्यम असून कमी शब्दांत जास्त भावना मांडता येत असल्यामुळे कवितेतून सामाजिक जाणीवा समृद्ध होतात. कवितेच्या माध्यमातून साहित्य-सांस्कृतिक वारसा जपला जातो. कवी सम्मेलन,व्याख्यानमाला,चर्चा सत्र, वाद विवाद स्पर्धा असे कार्यक्रम बहुदा पुणे, मुंबई, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्याने होत असतात. परंतु ग्रामीण भागातील साहित्य प्रेमींना दर्जेदार साहित्याची आणि कवितांची मेजवानी उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी या बहारदार काव्य मैफिलीसाठी पुढाकार घेतला आहे.
हि काव्य मैफल माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या काव्य मैफिलीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीचे सदस्य आमदार संजय केणेकर यांच्या हस्ते होणार असून समिती सदस्य आमदार प्रा.रमेश बोरनारे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. या मैफिलीचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले दिग्गज कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.या काव्य मैफिलीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आबा पाटील, नितीन चंदनशिवे, रमजान मुल्ला, गुंजन पाटील, लता ऐवळे, तालीफ सोलापुरी, आबेद शेख, शशिकांत शिंदे, शिवाजी बंडगर आणि संदीप काळे आदी कवींचा समावेश आहे. तर सूत्रसंवादकाची भूमिका म्हणून इंद्रजीत घुले पार पाडणार आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व साहित्यप्रेमी, कविता रसिकांनी आणि युवकांनी या भव्य काव्य मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हि काव्य मैफल कविता रसिकांसाठी पर्वणी आहे. त्यामुळे कोपरगावात या काव्य मैफिलीबाबत साहित्य व काव्य रसिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
