

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रभाग क्रमांक दोन येथील सुखशांतीनगर येथे संरक्षक भितींचे कामाचे भूमिपूजन रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक उपस्थित होते.वास्तविक पाहता काळे गटाच्या नगरसेविका स्मिताताई साबळे आणि त्यांचे पती शैलेश साबळे उपस्थित होते.मात्र अचानक दुसऱ्या दिवशी साक्षात्कार होऊन आम्हाला बोलावले नाही असा बनाव रचून केलेल्या खोट्या आरोपांचे खंडन पुराव्यानिशी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केले आहे.
जर नगरसेवकांना काय कामे सुरू आहे हे माहित नव्हते तर त्यांनी तिथे उपस्थित राहून फोटोसेशन कसे काय केले ? नागरिकांना आदल्या दिवशी उपस्थित रहा असे आवाहन का केले ? निमंत्रण नव्हते तर तिथे स्वतः सौ.साबळे यांनी कुदळ टाकताना फोटो कसे काय उपलब्ध आहेत.काळे गटाला सदर काम सुरू होणार असल्याची पूर्ण कल्पना होती तरीही त्यांनी दुसऱ्या दिवशी पालिकेत जात नाटकी बतावणी केली त्यामुळे उपलब्ध फोटो आणि व्हिडिओ दाखवत कोल्हे गटाने काळे नीती उघड पाडली आहे.
शहरात वेगाने सुरू झालेला बदल पाहून जनतेने नाकारलेल्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे करून खोटे बोलण्यास भाग पाडल्याचा हा प्रकार उघड झाला आहे. सौ. साबळे या काळे गटाच्या नगरसेविका त्या भूमिपूजनास उपस्थित होत्या त्यानंतर त्यांनी रेणुकाताई कोल्हे यांना घरी पाहुणचारास निमंत्रीत केले हे उपस्थित सर्वांना दिसले आहे.कदाचित आ.काळे यांनी शहानिशा न करता विनाकारण विकासाला विरोध करण्यासाठी पालिकेत जाण्यास दबाव टाकल्याने त्यांचे लोक गेले असतील असा टोला रणशूर यांनी लगावला आहे.
नगरसेवकांवर काळे यांचा विश्वास नसल्याने त्यांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेत दरवाजाबाहेर आपला पगारी कर्मचारी ठेवून मिटिंगचे मुद्दे लिहून घेण्यास सांगितले यावरून स्पष्ट होते आहे की काळे यांना फक्त राजकारण करायचे आहे.विकासाला एकीकडे विरोध करायचा आणि माध्यमांसमोर खोटे बोलून आपण कसे साव हे भासवण्याचा प्रयत्न करणे हे हास्यास्पद आहे असे शेवटी रणशूर म्हणाले.
( टीप: सदर भूमिपूजन छायाचित्रात काळे गटाच्या नगरसेविका सौ.स्मिता साबळे या भूमिपूजन प्रसंगी सहभागी असल्याचे दिसते आहे)
